‘सहकार खातं दबावासाठी असेल तर हा महाराष्ट्र, इथं दबाव टाकून सत्ताबदल होत नाही’, पवार-मोदी भेटीनंतर संजय राऊतांचा भाजपला इशारा

| Updated on: Jul 17, 2021 | 10:18 PM

पंतप्रधान मोदी यांनी पवारांसारख्या ज्येष्ठ खासदाराला भेटणं यात नवीन काही नाही. पवार साहेब हे सहकार क्षेत्रातील जाणकार आहेत. याच मुद्द्यांबाबत पवार आणि मोदी यांच्यात चर्चा झाल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.

सहकार खातं दबावासाठी असेल तर हा महाराष्ट्र, इथं दबाव टाकून सत्ताबदल होत नाही, पवार-मोदी भेटीनंतर संजय राऊतांचा भाजपला इशारा
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज राजधानी दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत मोदी आणि पवारांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. पवार आणि मोदींच्या या भेटीनंतर राज्यातील राजकारणा चांगलंच ढवळून निघालं आहे. मात्र, मोदी आणि पवार यांच्या भेटीत आश्चर्यकारक असं काही नाही. पंतप्रधान मोदी यांनी पवारांसारख्या ज्येष्ठ खासदाराला भेटणं यात नवीन काही नाही. पवार साहेब हे सहकार क्षेत्रातील जाणकार आहेत. याच मुद्द्यांबाबत पवार आणि मोदी यांच्यात चर्चा झाल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. त्याचबरोबर केंद्राकडून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाचा वापर दबावतंत्र म्हणून केला जाईल, या शक्यतेवरुनही राऊत यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut’s reaction after the meeting of PM Narendra Modi and Sharad Pawar in Delhi)

शरद पवार हे सहकार क्षेत्रातील जाणकार आहेत. मधल्या काळात रिझर्व्ह बँकेनं नागरी सहकारी बँकांवर लावलेले निर्बंध किती अडचणीचे ठरणार आहेत हे पवारांनी पंतप्रधान मोदींना सांगितल्याची माहिती संजय राऊत यांनी दिलीय. पवार आणि मोदी भेटीनंतर काही वेळातच संजय राऊत पवारांच्या भेटीला गेले होते. तिथून ते एकाच गाडीतून उपराष्ट्रपतींच्या भेटीलाही गेले. यावेळी पवारांनी मोदी आणि त्यांच्यात झालेल्या चर्चेची माहिती दिली. तसंच सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील अडचणी मोदींसमोर मांडल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर नवं सहकार खातं ज्यांच्याकडे आहे, अशा अमित शाह यांचीही भेट घ्यावी लागणार आहे, असं पवार म्हणाल्याचं राऊत यांनी सांगितलं.

‘राजकारणासाठी म्हणून सहकार क्षेत्र मोडू नये’

राजकारणासाठी म्हणून सहकार क्षेत्र मोडू नये. जर कुणी असं ठरवं असेल तर ते देशाच्या हिताचं नाही. महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटकात सहकार क्षेत्र मोठं आहे. मी असं ऐकलं आहे की नव्या सहकार मंत्र्यांनीही या क्षेत्रात काम केलं आहे. त्यामुळे ते या क्षेत्राचा वापर देशहितासाठीच करतील. पण फक्त राष्ट्रवादीचेच चार लोक आहेत म्हणून हे खातं निर्माण केलं असेल तर हे चुकीचं आहे. काँग्रेसमध्ये भाजपात गेलेले विखे-पाटील, पश्चिम महाराष्ट्रातील त्यांचे काही नेतेही या क्षेत्रात आहे. हे खातं दुरुस्तीसाठी असेल तर हरकत नाही. पण दबाव टाकून या क्षेत्रातील लोकांना आपल्या पक्षात घेणं चुकीचं आहे, असंही राऊत म्हणाले.

‘..हे भिंतीवर डोकं आपटल्यासारखं’

त्यावेळी कुठल्याही प्रकारचा दबाव टाकून, ईडीचा ससेमिरा लावून, सहकाराचे नियम बदलून, बँकांचे खाते सील करुन सत्ता येत नसते. अशाने जर सत्ता आली असती तर प्रत्येक राज्यात सत्तांतर झालं असतं. महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं ठरवलं आहे की काहीही झालं तरी मोडून पडायचं नाही. कुणी काहीही केलं तरी फरक पडणार नाही. हे भिंतीवर डोकं आपटल्यासारखं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आपला 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असा दावा संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केलाय.

संजय राऊतांचा भाजपला इशारा

हा महाराष्ट्र आहे. इथं दबाव आणून काही होत नाही. हे काही 30 आमदारांचं राज्य नाही. जिथे कुठले विचार नाहीत अशा राज्यात दबावातून सत्तांतर होतं. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात दबावातून सत्ताबदल होऊ शकत नाही, अशा शब्दात राऊत यांनी भाजपला एकप्रकारे इशाराच दिला आहे.

पवार-मोदींमध्ये राजकीय चर्चा झाली का?

शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत नवीन काही नाही. दोन व्यक्तींमध्ये झालेली चर्चा ही खासगीच असते. पण ही भेट सामाजिक, सहकार, बँकिंग क्षेत्राशी निगडीत होती असं राऊत यांनी आवर्जुन सांगितलं.

संबंधित बातम्या :

पंतप्रधान मोदी-पवार भेट बँकिंग क्षेत्राच्या प्रश्नाबाबत, भेटीबाबत काँग्रेस, मुख्यमंत्र्यांनाही कल्पना, राष्ट्रवादीकडून स्पष्ट

प्रत्येक भेटीत राजकारण का काढता?; पवार-मोदी भेटीवर संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut’s reaction after the meeting of PM Narendra Modi and Sharad Pawar in Delhi