Birds Dying in India :कोरोनानंतर बर्ड फ्लूचं संकट?, देशभरात हजारो पक्षांचा मृत्यू, राजस्थानात हायअलर्ट

| Updated on: Jan 04, 2021 | 1:38 PM

हिमाचल प्रदेशात तब्बल 1 हजार 500 हुन अधिक प्रवाशी पक्ष्यांचा मृत्यू, प्रशासनाकडून हायअलर्ट जारी

Birds Dying in India :कोरोनानंतर बर्ड फ्लूचं संकट?, देशभरात हजारो पक्षांचा मृत्यू, राजस्थानात हायअलर्ट
Follow us on

मुंबई: जगभरात कोरोनानं लाखो लोकांचा जीव घेतल्यानंतर आता देशातील विविध राज्यांमध्ये हजारो पक्षांचा मृत्यूच्या बातम्या (death of birds) येण्यास सुरुवात झाली आहे. या मृत्यू कशामुळे होत आहेत, हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, पक्षांमध्येही कुठलातरी भयाणक विषाणू तर पसरत नाही ना या गोष्टींची शंका येण्यास सुरुवात झाली आहे. कारण, हजारो किलोमीटर दूरवरुन भारतात येणाऱ्या प्रवासी पक्षांच्या (migrate birds) मृत्यूचं यामध्ये सर्वात मोठं प्रमाण आहे. शिवाय इंदूरमध्ये 2 मृत कावळ्यांमध्ये ‘H5N8’ म्हणजेच बर्ड फ्लूचा विषाणू आढळल्यानं पक्षांमधील विषाणू संसर्गाची (virus spread) शक्यता अधिक ठळक होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता विविध राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Mysterious death of thousands of birds in different parts of India)

इंदूरमध्ये मृत कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू विषाणू

मध्य प्रदेशात एका खासगी कॉलेजच्या परिसरात तब्बल 100 हुन अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्या कावळ्यांची तपासणी करण्यात आली, तेव्हा यातील 2 कावळ्यांमध्ये ‘H5N8’ म्हणजेच बर्ड फ्लूचा विषाणू आढळला आहे. विषाणू आढळल्यानंतर मध्य प्रदेशच्या पशूसंवर्धन विभाग सक्रीय झाला आहे. आणि त्यानंतर विविध स्तरावर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य प्रदेशात यापुढं मृत पक्ष्यांची तपासणी केली जाणार आहे.

पण हा H5N8 आहे तरी काय?

H5N8 हा पक्ष्यांमधील एक फ्लूचा प्रकार आहे. याला बर्ड फ्लू अथवा एवियन इन्फ्लुएन्झा म्हणतात. 1878 मध्ये पहिल्यांदा इटलीत पक्ष्यांमध्ये याची नोंद झाली. त्यानंतर याचा फैलाव माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्येही झाला. आणि याचे परिणाम जगाला भोगावे लागले.

पक्ष्यांमधील फ्लूला अधिक गांभीर्यानं घेण का गरजेचं?

1918 दरम्यान पसरलेल्या स्पॅनिश फ्लूमध्ये तब्बल 10 कोटी लोकांनी जीव गमावला, तर 1957 मध्ये एशियायी फ्लूमध्ये तब्बल 10 लाख लोक दगावले. शिवाय हाँगकाँग फ्लूमध्येही 10 लाख लोक दगावल्याची नोंद आहे. बर्ड फ्लू पक्ष्यांमधून कोंबड्यांमध्ये येण्याची शक्यता जास्त असते. कोंबड्यांचा खाद्याच्या रुपानं जगभरात सर्वाधिक वापर केला जातो. हेच पाहता आता प्रशासनाला सतर्क राहणं गरजेचं बनलं आहे. राजस्थान सरकारनं याच पार्श्वभूमीवर हायअलर्ट जारी केला आहे.

हिमाचल प्रदेशातही हजारो पक्ष्यांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशात तब्बल 1 हजार 500 हुन अधिक प्रवाशी पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. इथल्या पोंग डॅम या परिसरात पक्ष्यांच्या मृत्यूची माहिती आहे. या घटनेनंतर कांगडा जिल्हा प्रशासनाकडून या जलाशय परिसरातल्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय पक्ष्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विशेष तपासणीवर भर दिला जाणार आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या पक्ष्यांच्या रक्ताचे नमूने भोपाळच्या हाय सिक्युरिटी अॅनिमल डिजीज लॅबला पाठवण्यात आले आहेत.

राजस्थानातही पक्ष्यांच्या मृत्यूचं सत्र सुरु

राजस्थानातही पक्ष्यांच्या मृत्यूचं सत्र थांबताना दिसत नाही. जयपूरसह 7 जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 135 हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राजस्थान सरकारनं राज्यात हायअलर्ट जारी केला आहे. शिवाय पक्ष्यांच्या मृत्यूवर लक्ष्य ठेवण्यासाठी एक कंट्रोल रुमही तयार करण्यात आली आहे. शिवाय जिथं या कावळ्यांचा मृत्यू होत आहे, तिथे तज्ज्ञांची एक समितीही पाठवण्यात आली आहे. सांभर तलावातही काही दिवसांपूर्वी हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा पक्ष्यांच्या मृत्यूचं सत्र सुरु झालं आहे.

गुजरातच्या जुनागढमध्येही पक्ष्यांचा मृत्यू

गुजरातच्या जुनागढच्या एका गावाही आतापर्यंत 53 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन जागं झालं आहे. आणि पक्ष्यांच्या मृत्यूकडे बारकाईनं लक्ष्य ठेवलं जात आहे. इथल्या बाटला गावात एकाच दिवसांत 53 पक्षी मृतावस्थेत सापडले होते.

 

संबंधित बातम्या:

जगातील सर्वात मोठं पक्षी संग्रहालय गुजरातमध्ये; मुकेश अंबानींच्या मुलाचा पुढाकार!

पिल्लाच्या मृत्यूचा बदला घेणारा कावळा, तीन वर्षांपासून पाठलाग, डोक्यात टोचे

 

(Mysterious death of thousands of birds in different parts of India)