इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेलच्या भावात बदल? जाणून घ्या आजचा भाव..
इथेनॉल आणि साखरेच्या वाढत्या किमतींवर सरकारने स्पष्टीकरण दिल्यानंतर, पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर पहिल्यांदाच जाहीर करण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात की 22 ऑगस्ट रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर काय होते.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती हा सर्वसामान्यांच्या रोजच्या जीवनाशी थेट संबंधित असलेला विषय मानला जातो. कारण इंधनाच्या दरवाढीचा परिणाम वाहतूकीच्या खर्चावर सुद्धा होत असतो. त्यातच इथेनॉलवर सरकारचे स्पष्टीकरण तसेच साखरेच्या दरवाढीची चर्चा आणि त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज शनिवार 22 ऑगस्ट रोजी देशातील इंधनाचे दर जाहीर झाले असून, पेट्रोल-डिझेल महागले की स्वस्त झाले, की दर जैसे थेच राहिले? आजचे दर काय आहेत जाणून घेऊयात.
पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणते बदल झाले आहेत?
22 ऑगस्ट रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रूपये तर डिझेल 95.20 रूपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 111.21 रूपये आणि डिझेल 97.83 रूपये प्रति लिटर विकले जात आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरात शेवटची मोठी वाढ 25 मे रोजी झाली होती. त्यावेळी पेट्रोल 2.61 रूपयांनी आणि डिझेल 2.71 रूपयांनी प्रति लिटर महागले होते. त्यानंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात स्थिर आहेत.
सरकारने इथेनॉलमुळे साखर महागल्याचा दावा फेटाळला
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या धोरणामुळे साखरेच्या किमती वाढत असल्याचा दावा सरकारने फेटाळून लावला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, इथेनॉलसाठी साखरेचा वापर उलट कमी होत आहे. 2022-23 मध्ये साखरेचा सुमारे 12% हिस्सा इथेनॉलसाठी वापरला जात होता, तो 2025-26 मध्ये सुमारे 9% पर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे.
याशिवाय, देशातील जवळपास 75% इथेनॉल आता धान्यांपासून, विशेषतः मक्यापासून तयार केले जाते. त्यामुळे साखरेच्या दरवाढीला केवळ इथेनॉल धोरण जबाबदार असल्याचे म्हणणे योग्य नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
सरकारच्या मते, देशांतर्गत साखरेचे अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन, सणांपूर्वी वाढलेली मागणी, हवामानामुळे ऊस पिकाचे झालेले नुकसान, जागतिक बाजारातील पुरवठ्याची कमतरता तसेच साठेबाजी आणि सट्टेबाजी यांसारख्या अनेक कारणांमुळे साखरेच्या किमती वाढल्या आहेत.
भारतामध्ये दरवर्षी साधारण 320 ते 340 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होते, तर देशांतर्गत मागणी सुमारे 280 ते 290 लाख मेट्रिक टन असल्याचे सरकारने सांगितले आहे.
