NEET ची परीक्षा पुन्हा होणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, परीक्षा पद्धतीत दोष असल्याचे पुरावे नाहीत
परीक्षेतील पेपर फुटल्याच्या संशयावरून देशभरातील उच्च न्यायालयांमध्ये फेरपरीक्षेची मागणी करणाऱ्या याचिका दाखल झाल्या. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सर्व याचिकांवर एकत्र सुनावणीची प्रक्रिया सुरू झाली.

वैद्यकीय अभ्यास क्रमासाठीची केंद्रीय सामायिक चाचणी परीक्षा असलेल्या NEET चे पेपर उत्तर प्रदेशासह देशातील अनेक राज्यात फुटल्याने देशभर गोंधळ उडाला होता. तसेच या प्रकरणात सीबीआयने अनेकांना अटक केली देखील केली असताना सर्वाच्च न्यायालयाने NEET च्या परीक्षा पुन्हा घेण्याची काहीही आवश्यकता नाही असा आदेश मंगळवारी दिला आहे. या परीक्षेच्या आयोजनात काही नियमभंग झाल्याचा कोणताही विश्वासार्ह पुरावा सापडला नसल्याने या परीक्षा पुन्हा घेण्याची काही आवश्यकता नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
यापूर्वी झालेल्या सुनावणी वेळी सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने या संदर्भात नीट परीक्षेच्या विश्वासार्हतेला तडा गेल्याने ही परीक्षा पुन्हा घ्यावी की काय ? या निर्णयापर्यंत सर्वोच्च न्यायालय आले होते. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील आपला निर्णय राखून ठेवला होता. नीट परीक्षा 571 शहरातील एकूण 4750 केंद्रांसह 14 विदेशी शहरात आयोजित केली होती. मेडीकलच्या 1,08,000 जागांसाठी 24 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. 50 टक्क्यांची कट ऑफची टक्केवारी दर्शवते असे न्यायालयाला अवगत करण्यात आले होते.
पवित्रता भंग झाल्याचा सबळ पुरावा नाही !
या परीक्षेत 180 प्रश्न असतात त्यासाठी एकूण 720 गुण असतात. चूकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुण असतात. पेपर लीक हे पद्धतशीरपणे कट रचून केले होते आणि संरचनात्मक त्रूटींचा एकत्र विचार करता या प्रकरणात नीटची परीक्षा पुन्हा घेणे हाच एकमेव मार्ग असल्याचे याचिका कर्त्यांनी म्हटले होते. परंतू परीक्षेची पवित्रता भंग झाल्याचा कोणताही सबळ पुरावा सापडला नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
NEET परीक्षेचा निकाल 4 जून रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर पेपर फुटल्याचा मॅसेज व्हायरल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. सर्वप्रथम या परीक्षेत बिहारमध्ये पेपर फुटल्याचे समोर आले होते. त्यानंतर निकाल लागला तेव्हा परीक्षेतील 67 टॉपर्स आणि एकाच परीक्षा केंद्रातून पास झालेल अनेक टॉपर्स, एका प्रश्नाची दोन उत्तरे, ग्रेस मार्क्स इत्यादी वरुन प्रश्न विचारले गेले. ही परीक्षा घेणारी यंत्रणा एनटीएची चौकशी करण्याची मागणी पुढे आली.
नॅशनल टेस्टींग एजन्सीवर विद्यार्थ्यांचा संशय
‘एनटीए’ या नॅशनल टेस्टींग एजन्सीवर विद्यार्थ्यांनी संशय व्यक्त केला होता. नीट पेपर फुटीबाबत देशभरात निदर्शने झाली होती. परीक्षेतील पेपर फुटल्याच्या संशयावरून देशभरातील उच्च न्यायालयांमध्ये फेरपरीक्षेची मागणी करणाऱ्या याचिका दाखल झाल्या. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सर्व याचिकांवर एकत्र सुनावणीची प्रक्रिया सुरू झाली. या सुनावणीत बिहार पेपर लीकपासून हजारीबाग, सीकर आणि गोध्रा प्रकरणांचा तपास, एका प्रश्नाची दोन उत्तरे, सीबीआय तपास अशा सर्व मुद्द्यांवर युक्तीवाद झाला सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यावर लवकरात लवकर निर्णय द्यावा लागेल, कारण विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत ताठकळत ठेवता येणार नाही. हे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने आज आपला निकाल दिला आहे.
