IND vs PAK : ‘आम्ही चर्चेसाठी तयार, पण…’ भारताविरोधात पाकिस्तानकडून धमकीची भाषा

IND vs PAK : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात केलेली विधान पाकिस्तानला चांगलीच झोंबली आहेत. पाकिस्तानने थेट कारवाईची भाषा केली आहे. काश्मीर प्रश्नावरुन पाकिस्तानशी चर्चेचा प्रश्नच नाही हे भारताने आधीच स्पष्ट केलय.

IND vs PAK : आम्ही चर्चेसाठी तयार, पण... भारताविरोधात पाकिस्तानकडून धमकीची भाषा
PM Modi-Shehbaz Sharif
| Updated on: Sep 02, 2024 | 12:31 PM

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा इशारा पाकिस्तानला चांगलाच झोंबला आहे. जयशंकर यांनी नुकतच एका कार्यक्रमात म्हटलं होतं की, “पाकिस्तानसोबत चर्चेचा काळ संपलाय. आता पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर मिळेल” जयशंकर यांच्या वक्तव्यावर आता पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक वादग्रस्त मुद्दा आहे असं पाकिस्तानने म्हटलय. काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावातंर्गत तोडगा काढण्यात यावा असं पाकिस्तानने म्हटलं आहे.

जम्मू-काश्मीर वादावर एकतर्फी तोडगा काढता येऊ शकत नाही, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मुमताज जहरा बलूर रविवारी म्हणाले. “हा आंतरराष्ट्रीय स्तरावरच वादग्रस्त मुद्दा आहे. सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव आणि काश्मीरच्या जनतेच्या इच्छेनुसार यावर तोडगा काढला पाहिजे” असं पाकिस्तानने म्हटलं आहे. दक्षिण आशियात शांतता आणि स्थिरतेसाठी या वादावर तोडगा निघणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. “पाकिस्तान कुटनिती आणि चर्चेसाठी कटिबद्ध आहे. पण शत्रुत्वाच्या हेतुने कारवाई केली, तर ठोस उत्तर देऊ” असं बलूच म्हणाले.

चर्चेचा काळ संपलाय

दिल्लीमध्ये मागच्या शुक्रवारी एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी बोलताना जयशंकर यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले. सोबतच इशारा सुद्धा दिला. “पाकिस्तानसोबत आता कुठलीही चर्चा होणार नाही. त्यांच्यासोबत चर्चेचा काळ संपलाय. आता त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळेल. पाकिस्तान दहशतवादाची निर्यात करतो” असं जयशंकर म्हणाले.

त्याचं भाषेत उत्तर

दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही असं जयशंकर म्हणाले. “जम्मू-काश्मीरचा विषय असेल, तर तिथे अनुच्छेद 370 आता संपुष्टात आलाय. पाकिस्तानच्या प्रत्येक सकारात्मक आणि नकारात्मक कृतीला त्याच भाषेत प्रत्युत्तर मिळेल. भारताने अनेकदा पाकिस्तानला हे स्पष्ट केलय की, जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचे अविभाज्य अंग आहेत आणि नेहमी राहतील” असं जयशंकर म्हणाले.