
‘माझ्या स्वभावानुसार मी कधीही पूर्णपणे संतुष्ट होत नाही’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी बोलले. “तुम्ही जेव्हा सार्वजनिक जीवनात असता, तेव्हा तुमच्यामध्ये एक सकारात्मक अस्वस्थतता असते. ती आवश्यक सुद्धा आहे. त्यामुळेच तुम्हाला सतत अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. ज्यातून तुम्हाला नेहमी प्रेरणा मिळते” असं पीएम मोदी म्हणाले. देश आणि जनतेसाठी नेहमी काहीतरी चांगलं करण्याची इच्छा असते असं पीएम मोदी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. रिफॉर्म एक्सप्रेस अंतर्गत होणाऱ्या बदलांवर तुम्ही संतुष्ट आहात का? त्या प्रश्नावर उत्तर देताना मोदी म्हणाले की, “मी पूर्णपणे संतुष्ट नाहीय. कधी संतुष्ट होणारही नाही. सतत पुढे जाण्याचा आणि सुधारणांवर विचार करण्याचा माझा स्वभाव आहे”
रिफॉर्म एक्सप्रेसवर बोलताना मोदी असं सुद्धा म्हणाले की, “आतापर्यंत जी प्रगती आणि विकासकामं झाली आहेत, त्याकडे डोळेझाक करता येणार नाही. सुधारणा करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. त्या पूर्ण निष्ठेने लागू केल्या जात आहेत. सरकार यासाठी काम करत आहे”
देश नव्या दिशेने पुढे चाललाय
“आमच्या सरकारने छोट्या-मोठ्या बदलांच्या पुढे जात व्यवस्थेमध्ये मोठे आणि पायाभूत बदल केले आहेत. देश आता हळूहळू सुधारणांच्या माध्यमातून नव्या दिशेने पुढे चाललाय” याचा अभिमान असल्याचं मोदी म्हणाले.
कुठलाही ठोस परिणाम आला नव्हता
“मागच्या काही वर्षात भारताची जागतिक भागिदारी वेगाने वाढलीय. अलीकडचे व्यापार करार अचानक झालेले नाहीत.
मजबूत होणारी देशांतर्गत अर्थव्यवस्था, प्रतिस्पर्धी उद्योग आणि आत्मविश्वासाचा हा परिणाम आहे. यूपीए सरकारच्या काळातही व्यापार कराराचा प्रयत्न झालेला. दीर्घ चर्चेनंतर कुठलाही ठोस परिणाम आला नव्हता” असं पीएम मोदी म्हणाले.
विश्वासू भागीदार म्हणून उदय
“विद्यमान सरकार आल्यानंतर नितीगत सुधारणा, राजकीय स्थिरता आणि स्पष्ट धोरणांवर जोर दिलाय. त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत बनलीय. जगाचा विश्वास वाढलाय. गुंतवणूक वाढली आणि भारताचा एक विश्वासू भागीदार म्हणून उदय झालाय” असं ते म्हणाले.
किती देशांसोबत फ्री ट्रेड करार
“युरोपियन युनियनसोबत करारावर या आधी सुद्धा चर्चा झाली होती. पण अखेरीस दोन्ही बाजूंच्या फायद्याचा करार आता झाला आहे. मागच्या काही वर्षात भारताने 38 देशांसोबत फ्री ट्रेड करार केले आहेत. हा स्वत:मध्येच एक रेकॉर्ड आहे. हे करार विविध खंड आणि विभिन्न आर्थिक ताकद असलेल्या देशांसोबत झाले आहेत. भारतीय कंपन्या अनेक मोठ्या बाजारात पोहोचल्या आहेत” असं पीएम मोदी म्हणाले.