लसीवर जे संशय व्यक्त करतायत ते भावा-बहिणींच्या आयुष्याशी खेळतायत, मोदींच्या निशाण्यावर विरोधक

| Updated on: Jun 07, 2021 | 6:10 PM

"कोरोना लसीबाबत जे लोक अफवा पसरवत आहेत ते आपल्या भावा-बहिणींच्या आयुष्यासोबत खेळत आहेत", असं पंतप्रधान मोदी म्हणाले (PM Narendra Modi slams opposition leaders over corona vaccine rumour).

लसीवर जे संशय व्यक्त करतायत ते भावा-बहिणींच्या आयुष्याशी खेळतायत, मोदींच्या निशाण्यावर विरोधक
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं. तसेच देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेबाबतही सविस्तर माहिती दिली. केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेवर आणि देशात निर्माण होणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसींवर विरोधकांकडून बऱ्याचदा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यांच्या या टीकेवर मोदींनी नाव न घेता निशाणा साधला. “कोरोना लसीबाबत जे लोक अफवा पसरवत आहेत ते आपल्या भावा-बहिणींच्या आयुष्यासोबत खेळत आहेत”, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले (PM Narendra Modi slams opposition leaders over corona vaccine rumour).

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

“जेव्हापासून भारतात लस निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली तेव्हापासून काही लोकांनी असे वक्तव्य केले ज्याने सर्वसामान्यांच्या मनात लसीबाबत शंका निर्माण होईल. भारतात लस निर्मिती करणाऱ्या संशोधकांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्यांच्या कामात बाधा यावे, असे प्रयत्न करण्यात आले”, असा दावा नरेंद्र मोदींनी केला (PM Narendra Modi slams opposition leaders over corona vaccine rumour)..

“जेव्हा भारताची लस आली तेव्हा काही लोकांनी अनेक माध्यमांद्वारे शंका-कुशंकाना उपस्थित केल्या. लोकांनी लस घेऊ नये यासाठी अफवा पसरवण्यात आल्या. जे लोग अशा प्रकारे अफवा पसरवत आहेत त्यांनाही देश बघत आहे. जे लोक अशाप्रकारे लसीवर शंका उपस्थित करत आहेत, अफवा पसरवत आहेत ते आपल्या भोळ्या भाऊ-बहिणींच्या जीवाशी खेळत आहेत”, अशा शब्दात मोदींनी विरोधकांवर नाव न घेता निशाणा साधला. तसेच “अशा अफवांपासून सतर्क राहण्याची जास्त आवश्यकता आहे. मी सर्वांना विनंती करतो, लसीबाबत जागृकता वाढवा”, असं आवाहन देखील मोदींनी यावेळी केलं.

‘राज्यांनी सर्व करायचं तर केंद्र काय करणार’

“केंद्र सरकारच सर्व का करतंय, राज्यांना अधिकार का नाहीत? असं काहींकडून विचारण्यात आलं. आमच्यावर प्रश्न विचारण्यात आले, राज्यांनी सर्व करायचं तर केंद्र काय करणार? असंही विचारलं. मात्र केंद्राने एक गाईडलाईन बनवून राज्यांना नियमावली दिली”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

“देशातील नागरिक नियम पाळत आहेत. लसीकरण नीट सुरु झालं. अशावेळी काही राज्यांनी लसीकरणाबाबत प्रश्न विचारले, वयोगट का, विकेंद्रीकरण का नाही, ज्येष्ठांनाच का पहिले लस, देशातील काही मीडियाने याबाबत कॅम्पेन केलं, मात्र अनेक चर्चेनंतर राज्यांच्या आग्रहास्ताव 16 जानेवारीपासून नियम बदल करण्यात आला. 25 टक्के काम राज्यांवर सोपवण्यात आलं”, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

“1 मे पासून राज्यांना 25 टक्के काम सोपवण्यात आलं, काहींनी प्रयत्न केलं, काहींना अडचणी समजून आल्या. जगात लसींची उपलब्धता किती आहे हे राज्यांना समजलं. मे मध्ये कोरोनाची दुसरी लाट, लसींचा तुटवडा, राज्य सरकारच्या अडचणी असे प्रश्न होते. त्यानंतर सर्व राज्यांना समजलं, केंद्राचीच यंत्रणा नीट होते. राज्यांना अधिकार द्या असं जे म्हणत होते, त्यांनाही कळून चुकलं”, असा टोला मोदींनी विरोधकांना लगावला.

संबंधित बातम्या :

मोदींची मोठी घोषणा! 18 वर्षावरील सर्वांचं 21 जूनपासून मोफत लसीकरण करणार, केंद्र सरकार सर्व खर्च उचलणार

सर्वांना मोफत लस, दिवाळीपर्यंत 80 कोटी जनतेला मोफत धान्य!