पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार जनतेशी संवाद, निवडणुकांच्या ऐतिहासिक निकालावर काय बोलणार?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची ऐतिहासिक कामगिरी; पश्चिम बंगालमध्ये १७५ तर आसाममध्ये ९५ जागांवर आघाडी घेत विजयाकडे वाटचाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार जनतेशी संवाद, निवडणुकांच्या ऐतिहासिक निकालावर काय बोलणार?
Pm narendra modi
| Updated on: May 04, 2026 | 1:43 PM

सध्या देशातील राजकारणातील महत्त्वाची राज्य असलेल्या पश्चिम बंगालसह आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट होऊ लागले आहेत. या पाच राज्यातील एकूण ८२४ जागांची मतमोजणी केली जात आहे. यातील बहुतांश जागांवर भाजपने आपल्या विजयाची पताका फडकवली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये भाजपने अनपेक्षित मुसंडी मारत बहुमताचा आकडा पार केला आहे. तर आसाममध्ये आपली सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. या विजयामुळे देशभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे.

या निवडणुकांमध्ये सर्वात मोठे लक्ष पश्चिम बंगालकडे लागले होते. ताज्या माहितीनुसार, भाजपने पश्चिम बंगालमध्ये १७५ हून अधिक जागांवर आघाडी घेत सत्ताधारी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. अनेक दशकांपासून प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व असलेल्या या राज्यात भाजपने मिळवलेले हे यश ऐतिहासिक मानले जात आहे. राज्याच्या राजकारणात झालेला हा सत्तापालट भविष्यातील राष्ट्रीय राजकारणाची दिशा बदलणारा ठरणार आहे.

आसाममध्ये सत्ता राखली, पुदुचेरीमध्येही आघाडी

आसाममध्ये भाजपने आपली कामगिरी कायम राखत ९५ जागांवर आघाडी मिळवली आहे. विकास आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर मतदारांनी पुन्हा एकदा भाजपला मतदान केल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, दक्षिण भारतातही भाजपने आपली पाळेमुळे घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. तसेच पुद्दुचेरीमध्ये भाजप आणि मित्रपक्षांच्या आघाडीने बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. यामुळे या ठिकाणी एनडीएचे सरकार स्थापन होण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

सध्या या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या विजयाचा कल लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी ५ वाजता दिल्लीतील भाजप मुख्यालयात उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते विजयाचा जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील. तसेच या ऐतिहासिक यशाबद्दल ते जनतेचे आभार मानण्याची शक्यता आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपची तळागाळातील संघटनात्मक बांधणी, अमित शाह यांची निवडणूक रणनीती आणि पंतप्रधान मोदींची लोकप्रियता या त्रिसूत्रीमुळे पक्षाला हे यश मिळाले आहे. हे सध्याचे कल असले, तरी भाजपच्या गोटात विजयाचा विश्वास पूर्णपणे निर्माण झाला आहे.

Follow Us