‘दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल…’, ऑपरेशन ‘सिंदूर’बद्दल काय म्हणाले मोदी?
भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादाचं कंबरडं मोडलं आहे. दहशतवाद्यांचे 9 ठिकाणं उद्ध्वस्त झाले, त्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं .

पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला, त्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून या हल्ल्याचा बदला घेतला, पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, यामध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादांचा मृत्यू झाला, दरम्यान ऑपरेशन सिंदूरनंतर आज प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले मोदी?
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, सर्व पक्ष एका सुरात दहशतवादाच्या विरोध कठोर कारवाईसाठी एकजूट झाले. आपण दहशतवाद्यांना मातीत घालण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण सूट दिली. आज प्रत्येक दहशतवादी आणि दहतवाद्यांच्या प्रत्येक संघटनेला कळून चुकलंय की, आपल्या बहिणीच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो. ऑपरेशन सिंदूर हे केवळ नाव नाही. ते देशाच्या कोटी कोटी लोकांच्या भावनांचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायची अखंड प्रतिज्ञा आहे. 6 मे रोजी रात्री उशिरा, 7 मे च्या सकाळी संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेला परिणामात बदलेलं पाहिलं आहे. भारताच्या सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर, त्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर अचूक प्रहार केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल, भारत एवढा मोठा निर्णय घेईल, असं मोदी यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जेव्हा देश एकजूट होतो, नेशन फर्स्टच्या भावनेने भारलेला असतो, राष्ट्र प्रथम असतं, तेव्हा फोलादी निर्णय घेतले जातात. परिणाम आणले जातात. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर भारताच्या मिसाईलने हल्ला केला, ड्रोनने हल्ला केला, तेव्हा दहशतवाद्यांच्या इमारतीच नव्हे तर त्यांचं आवसानही गळालं. बहावलपूर आणि मुरीदके सारखे दहशतवाद्यांचे अड्डे ग्लोबल टेररिझमची युनिव्हर्सिटी होत्या. जगात कोणतेही मोठे दहशतवादी हल्ले झाले, तरी त्यांचं कनेक्शन इथेच सापडत होतं. दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींचं कुंकू पुसलं. त्यामुळे आम्ही दहशतावद्यांचे हे हेड क्वॉर्टर उद्ध्वस्त केले, असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
