बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधान बदललं जाणार नाही; नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसला करारा जवाब

गेल्या 70 वर्षात कुणीही माता भगिनींचं ऐकलं नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला... मोदीला जनतेची सेवा करण्याची संधी दिली तेव्हा मी जल जीवन मिशन सुरू केलं. पाण्याची टंचाई दूर करण्याचा विडा उचलला. आम्ही राजस्थानात 50 लाख घरात पाणी पोहोचवलं. पण राजस्थानात जेवढा काळ काँग्रेसचं सरकार होतं, तेवढा काळ त्यांनी जल जीवन मिशनमध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला, असा हल्लाबोलच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधान बदललं जाणार नाही; नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसला करारा जवाब
Prime Minister Narendra Modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 12, 2024 | 6:02 PM

भाजप तिसऱ्यांदा देशात सत्तेत आल्यास भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान ते बदलून टाकतील, असा दावा काँग्रेस आणि विरोधकांकडून केला जात आहे. भाजपच्या खासदाराचं विधानच त्यासाठी पुरावा म्हणून दिलं जात आहे. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. आम्ही संविधान बदलणार नसल्याचं भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे. आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राजस्थानच्या बाडमेर येथील रॅलीतून यावर भाष्य केलं आहे. स्वत: बाबासाहेब आंबेडकर आले तरी संविधान बदललं जाणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितलं आहे. मोदींनी थेट काँग्रेसला उत्तर देत संविधान बदलण्याच्या चर्चांनाच पूर्णविराम दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक रॅलीला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच बाबासाहेबांनी बनवलेलं संविधान हे नुसतं संविधान नाही तर आपल्यासाठी संविधान म्हणजे कुरान, बायबल आणि गीता आहे, असं मोदी म्हणाले. संविधानावर वारंवार चर्चा होते. मोदींचे शब्द लिहून ठेवा, बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधाना बदललं जाणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आपलं संविधान सरकारसाठी गीता आहे, रामायण आहे, महाभारत आहे, कुरान आहे, बायबल आहे. हे सर्व काही आमच्यासाठी आपलं संविधान आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

थापेबाजीपासून सावध राहा

एससी, एसटी, ओबीसी बंधू भगिनीशी अनेक दशकांपासून भेदभाव करणारी काँग्रेस सध्या जुनी रेकॉर्ड वाजवत आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा संविधानाच्या नावाने इंडिया अलायन्सवाले खोटं बोलत असतात. ही त्यांची फॅशन झालीय. ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना निवडणुकीत पराभूत केलं, ज्यांनी बाबासाहेबांना भारत रत्न दिलं नाही, ज्यांनी देशात आणिबाणी लागू करून संविधान संपवण्याचं काम केलं,
आज ते मोदींना शिव्याशाप देण्यासाठी संविधानाच्या नावाने खोटं बोलत आहेत. मीच देशात पहिल्यांदा संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. काँग्रेसने तर संविधान दिनालाही विरोध केला होता. हा बाबासाहेब आणि त्यांच्या संविधानाचा अपमान नव्हता काय? आम्ही बाबासाहेबांशी संबंधित पाच तिर्थस्थळांचा विकास केला. त्यामुळे काँग्रेस आणि इंडिया अलायन्सच्या थापेबाजीपासून सावध राहा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

मुस्लिम लीगची छाप

पंतप्रधानांनी यावेळी काँग्रेसच्या अजेंड्यावरही टीका केली. काँग्रेसचा अजेंडा द्वेषाने भरलेला आहे. या निवडणूक अजेंड्यात देशाच्या फाळणीला कारणीभूत असलेल्या मुस्लिम लीगची छाप दिसतेय. या आघाडीत सामील झालेल्या आणखी एका पक्षाने देशाच्या विरोधात एक धक्कादायक घोषणा केली आहे. भारतातील अण्वस्त्र नष्ट करू, समुद्रात बुडवू, असं या अजेंड्यात म्हटलं आहे, असं मोदी म्हणाले.

ही कसली आघाडी?

आपल्या देशाच्या शेजारील दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत. त्या देशातील अण्वस्त्रही नष्ट झाले पाहिजे का? पण इंडी अलायन्सचा हा विचार आहे. तुमचे सहकारी कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत हा माझा काँग्रेसला सवाल आहे. भारताला शक्तीहिन करणारी ही कसली आघाडी आहे? कुणाच्या दबावाखाली ही आघाडी आपली अण्वस्त्र ताकत कमी करायला निघाली आहे? असा सवालच त्यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us