हिंदू- मुसलमान नव्हे… संकटात कोण? रामदेव बाबांनी थेट कुणाचे नाव घेतले?
योगगुरू रामदेव बाबांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मोठे विधान केले आहे. त्यांच्या मते, देशात हिंदू-मुस्लिम, शीख, ख्रिश्चन नाही, तर देशाचे बालपण, तारुण्य, वर्तमान आणि भविष्य संकटात आहे. आंदोलनासाठी मुलांचा वापर थांबवावा. मुलांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. आंदोलनांमध्ये अराजक आणि हिंसा टाळून शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर योग गुरू रामदेव बाबा यांनी मोठं विधान केलं आहे. देशामध्ये हिंदू संकटात आहे, ना मुसलमान संकटात आहे, ना शीख, ना ख्रिश्चन संकटात आहे. संकटात देशाचं बालपण आहे. देशाचं तारुण्य आहे. देशाचं वर्तमान आणि भविष्य संकटात आहे. देशाची प्रकृती आणि संस्कृती धोक्यात आहे, असं सांगतानाच काही लोक आंदोलनासाठी मुलांचा वापर करत आहेत. लहान मुलांना आंदोलनात ढकलू नये. मुलं शिकतील कधी? आंदोलनातील मुलांचा वापर बंद व्हावा. आंदोलनात अराजक आणि हिंसा होऊ नये, असं बाबा रामदेव म्हणाले.
जंतरमंतरनंतर रांचीमध्येही विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं. देशातील इतर राज्यांमध्येही विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. आपलं शिक्षण सोडून मुलं आंदोलनात वेळ वाया घालवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रामदेव बाबांनी हे विधान केलं आहे. मुलं आंदोलन करतील, अधिकाऱ्यांच्या ऑफिसला घेराव घालतील तर मग अभ्यास कधी करतील? असा सवाल रामदेव बाबांनी केला आहे.
अराजक आणि हिंसा होऊ नये
शिक्षण घेणाऱ्या मुलांनी आंदोलनापासून दूर राहिलं पाहिजे. संवैधानिक आणि शांततेच्या मार्गानेच आपल्याला स्वांतत्र्य मिळालं. त्यामुळे आंदोलने अराजक आणि हिंसक होऊ नयेत, असं त्यांनी सांगितलं. दिल्लीच्या जंतरमंतरवरील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर रांचीमध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा 24 वा दिवस आहे. विद्यार्थी सीबीआय चौकशीची मागणी, जेएसएससी-सीजीएल रद्द करण्याच्या मागणीवर अडून आहेत. आज दुपारी दोन वाजता सरकार आणि विद्यार्थ्यां दरम्यान चर्चा होणार आहे. हेमंत सोरेन यांच्या सरकारने विद्यार्थ्यांना त्यांच्या सल्लागारांसोबत चर्चा करण्यासाठी बोलावलं आहे.
आंदोलनात अश्रूधुराच्या नळकांड्या
यापूर्वी 9 ऑगस्ट रोजी सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये चर्चा झाली होती. पण या चर्चेतून काहीच निष्पन्न झालं नव्हतं. मागच्यावेळी रांची प्रशासनाने विद्यार्थ्यांवर लाठीमारही केला. विधानसभेच्या दिशेने कूच करणाऱ्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला होता. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या. दरम्यान, यापूर्वीही रामदेव बाबांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सरकारला इशारा दिला होता. मला परत आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका, असं रामदेव बाबा म्हणाले होते. देशात सरकारी नोकरी भरतीत 99 टक्के घोटाळा होत असतो. लाच घेतल्याशिवाय नोकरी मिळत नाही. जात, धर्म, समूह आणि वशिल्याचा विचार करूनच नोकरी दिली जाते, असा दावाही रामदेव बाबांनी केला होता.
