पाकिस्तानकडून अंबानी-अदानी यांनी धोका! भारत सरकारकडून हाय अलर्ट जारी, या ठिकाणी होऊ शकतो मोठा हल्ला

पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या गुजरातमधील रिलायन्स ऑइल रिफायनरी आणि कच्छमधील जगातील सर्वांत मोठ्या सौर ऊर्जा पार्कची सुरक्षा केंद्र सरकारने वाढवली आहे. या प्रकल्पांमध्ये अदानी ग्रीन, रिलायन्स, एनटीपीसी आणि इतर कंपन्यांचा समावेश आहे.

पाकिस्तानकडून अंबानी-अदानी यांनी धोका! भारत सरकारकडून हाय अलर्ट जारी, या ठिकाणी होऊ शकतो मोठा हल्ला
Gautam Adani and Mukesh Ambani
Image Credit source: Instagram
| Updated on: May 08, 2025 | 8:37 AM

गुजरातमधील जामनगर इथं असलेल्या रिलायन्सच्या तेल शुद्धीकरण कारखान्याला धोका वाढला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी सीमेजवळील ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांची सुरक्षा वाढवली आहे. यामध्ये खावडामध्ये बांधण्यात येणारा जगातील सर्वांत मोठा सौर ऊर्जा पार्कसुद्धा समाविष्ट आहे. यामधील एक मोठा भाग अदानी ग्रीनचा असून जामनगरमध्ये जगातील सर्वांत मोठा तेल शुद्धीकरण कारखानासुद्धा आहे. ‘मिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार खावडा रिन्यूएबल एनर्जी पार्क आणि जामनगर रिफायनरीसारख्या ऊर्जा प्रकल्पांवर आधीच सुरक्षा हाय अलर्टवर होती. आता ऑपरेशन सिंदूरनंतर ती आणखी कडक करण्यात आली आहे.

खावडा प्रकल्पाला जगातील सर्वांत मोठा रिन्यूएबल एनर्जी पार्क म्हटलं जातं. याची क्षमता एकूण 45 गीगावॅट आहे. यातील सर्वांत मोठा भाग अदानी ग्रीनचा आहे, जे 30 गीगावॅटचा प्लांट विकसित करत आहेत. याशिवाय NTPC आणि गुजरात इंडस्ट्रीज पॉवर कंपनीसुद्धा या प्रोजेक्टमध्ये सहभागी आहे. हा पार्क कच्छमध्ये भारत-पाकिस्तान सीमेपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे. सीमा सुरक्षा दलद्वारे (बीएसएफ) याची देखरेख केली जाते. जामनगरमधील रिफायनरीसुद्धा हाय अलर्टवर असण्याचं कारण म्हणजे तिथे एअरबेस आहे. हा परिसर सर्वसामान्य विमानांसाठी ‘नो फ्लाय झोन’ आहे. ही रिफायनरी रिलायन्स इंडस्ट्रीजची असून ती जगातील सर्वांत मोठी रिफायनरी मानली जाते. दररोज 14 लाख बॅरल तेल प्रक्रिया करण्याची याची क्षमता आहे.

रिन्यूएबल ऊर्जा संसाधनांचं संरक्षण करण्यासाठी अनेक पातळ्यांवर ठोस धोरण आवश्यक असल्याचं हार्टेक ग्रुपचे सीईओ सिमरप्रीत सिंग म्हणाले. यामध्ये सीमा भिंतीसारखी भौतिक सुरक्षा, देखरेख, कर्मचारी आणि सायबर सुरक्षा यांचा समावेश असावा, असं त्यांनी नमूद केलं. त्याचप्रमाणे प्रतिसादाची वेळ कमी ठेवणं, विमा पॉलिसींद्वारे आर्थिक जोखीम व्यवस्थापित करणं आणि नियमित सेफ्टी ड्रिल्ससुद्धा गरजेचं असल्याचं ते म्हणाले.

जामनगर, नलिया आणि भुज हे या तीन हवाई दलाच्या तळांच्या 50 किलोमीटरच्या परिघात आहेत आणि हा परिसर पूर्णपणे हाय अलर्टवर आहे. याशिवाय जामनगर विमानतळासह देशातील 24 विमानतळ 9 मे पर्यंत बंद करण्यात आले आहेत.