
जोधपुरमधील कांकाणी काळवीट शिकार प्रकरणात सलमान खान आणि इतर कलाकार दोषी आढळलेले आहेत. या प्रकरणी उद्या (16 फेब्रुवारी) राजस्थान उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. यात सलमान खानच्या भूमिकेबाबत निकाल येण्याची शक्यता आहे. जोधपूरच्या कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणात सलमान खानला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेविरूद्ध सलमान खानने उच्च न्यायालयात अपील केलेले आहे. सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत यांनी यापूर्वी उच्च न्यायालयात सलमान खान आणि इतर संबंधित कलाकारांच्या बाबतीतील प्रकरणाची सुनावणी एकत्र व्हावी यासाठी याचिका दाखल केली होती. त्यानुसार आता उद्या याबाबत सुनावणी पार पडणार आहे.
काळवीट शिकार प्रकरणात सह-आरोपी अभिनेता सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे आणि स्थानिक रहिवासी दुष्यंत सिंग यांना ट्रायल कोर्टाने निर्दोष मुक्त केले होते. मात्र राज्य सरकारने या निर्दोष मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे आता या कलाकरांच्या संबंधित प्रकरणावरही सुणावणी पार पडणार आहे.
5 एप्रिल 2018 रोजी सलमान खानला या प्रकरणात पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि इतर सह आरोपी सैफ अली खान, नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि दुष्यंत यांना निर्दोष मुक्त करण्यात आले होते. सलमान खानने या शिक्षेविरुद्ध जिल्हा आणि सत्र न्यायालयात अपील केले होते, त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. मात्र त्यानंतर राज्य सरकारने सहआरोपींच्या निर्दोष मुक्ततेविरुद्ध राजस्थान उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी परवानगी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या सुनावणीत सलमान खानच्या पाच वर्षांच्या शिक्षेला आव्हान देणारे अपील देखील उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यात आले होते.
त्यानंतर 15 ऑक्टोबर 1998 रोजी लुणी पोलिस ठाण्यात सलमान खानविरुद्ध दाखल केलेल्या शस्त्रास्त्र कायद्याच्या खटल्यातील अपील देखील 21 मार्च 2022 रोजी उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यात आले होते. त्यामुळे आता जर उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या अपीलाची दखल घेतली तर पूर्वी निर्दोष मुक्त झालेल्या सहआरोपींची अडचण वाढण्याची शक्यता आहे. उद्या होणाऱ्या या सुनावणीत सलमान खान आणि इतर आरोपींची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
1998 मध्ये जोधपूरच्या जवळ’हम साथ साथ हैं’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्यावेळी सलमान खान, सैफ अली खान, नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि इतरांनी काळवीटांची शिकार केली होती. त्यामुळे या सर्वांच्या विरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण अजूनही कोर्टात सुरू आहे.