मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूखंड घोटाळ्याची कागदपत्रे कुणाला दिली?; संजय राऊत यांच्या विधानाने खळबळ
एका तरुण नेत्याचं स्वागत केलं पाहिजे. भाजपनेही स्वागत केलं पाहिजे. मोठी तपश्चर्या असल्याशिवाय कोणताही नेता एवढा मोठा मार्च काढू शकत नाही. हा इव्हेंट नाही.
नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूखंड घोटाळ्यावरून महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने हिवाळी अधिवेशन दणाणून सोडलं आहे. विरोधकांनी या प्रकरणी शिंदे यांच्यावरच थेट आरोप करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. महाराष्ट्रात विरोधकांनी शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला असतानाच आता ठाकरे गटाने दिल्लीतही शिंदे यांच्याविरोधात हालचाली सुरू केल्या आहेत. थेट केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांकडेच शिंदे यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे देण्यात आली आहेत. तशी माहितीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्र्यांवरील आरोप गंभीर आहेत. त्यामुळे आम्ही केंद्रातील प्रमुख लोकांना कागदपत्रं पाठवली आहेत. योग्य ठिकाणी कागदपत्रं गेली आहेत. अनेक तपास यंत्रणांकडे कागदपत्रं गेली आहेत. आम्ही योग्य ठिकाणी कागदपत्रे दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घाईने दिल्लीत आले.
ते कशाला आले माहीत नाही? पण बहुतेक त्यासाठीच आले असावेत, असं सांगत संजय राऊत यांनी संशयाचं वातावरण तयार केलं आहे. मात्र, राऊत यांच्या या बॉम्बगोळ्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 110 कोटींचे भूखंड आपल्या मर्जीतील बिल्डरांना 2 कोटीत दिले. जे 16 भूखंड गरिबांच्या घरांसाठी राखीव होते. त्यावर काही निष्कर्ष काढण्यात आले होते. तेव्हा भूखंड वाटपाला विरोध झाला होता. तरीही तेव्हाच्या नगरविकास मंत्र्यांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ भूखंड वाटप केलं होतं. त्यावर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
राज्यात एवढा मोठा भूखंड घोटाळा झाला. अण्णा हजारे हे या विषयावर गप्प का आहेत? सरकारने बोहणीचा भ्रष्टाचार केला. त्यावर कोणी काहीच बोलत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारवासारव करतात. ही मोदींच्या विचारधारेची फसवणूक आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेवरूनही भाजपवर हल्लाबोल केला. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा दिल्लीच्या सीमेवर रोखण्याचा अटोकाट प्रयत्न सुरू आहे. कोरोनाची भीती दाखवत आहेत. कायदा सुव्यवस्थेची भीती दाखवत आहे. कशाला घाबरता? असा सवाल राऊत यांनी केला.
एका तरुण नेत्याचं स्वागत केलं पाहिजे. भाजपनेही स्वागत केलं पाहिजे. मोठी तपश्चर्या असल्याशिवाय कोणताही नेता एवढा मोठा मार्च काढू शकत नाही. हा इव्हेंट नाही. लोक स्वत:हून यात्रेत सहभागी होत आहेत.
राजकीय लाभ आणि तोटा या पालिककडे जाऊन या यात्रेला पाहिले पाहिजे. भाजपला धडकी भरली आहे. दिल्लीत यात्रा आल्यावर जग त्याची दखल घेईल. पुढच्या आठवड्यात ती दिल्लीत येईल. आम्ही या यात्रेत सहभागी होणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.