शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंना 5 हजार कोटींना विकला, संजय राऊत यांचा मोठा दावा
खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे की, निवडणूक आयोगाने अमित शाह यांच्या दबावाखाली शिवसेना ५००० कोटींना एकनाथ शिंदे गटाला विकली. राऊत यांच्या मते, आयोगाने दलालाची भूमिका बजावली असून, लोकशाही विकली जात आहे. केवळ शिवसेनाच नव्हे, तर आयोगाने इतरही चार पक्ष विकल्याचा आरोप त्यांनी केला.

पक्षात आमचं बहुमत असताना निवडणूक आयोगाने आमचा पक्ष अमित शाह यांच्या दबावाखाली एकनाथ शिंदे यांना 5 हजार कोटींना विकला आहे. निवडणूक आयोगात सेटिंग आणि बेटिंग करणं यात जनतेचे 5 हजार कोटी खर्च झाले. अमित शाह यांच्या शेअर मार्केटमधून आमचा पक्ष विकला गेला, असा आरोप करतानाच आमचाच नव्हे तर निवडणूक आयोगाने आणखी चार पक्ष विकले, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत मीडियाशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्यापर्यंत चालणार असल्याचंही सांगितलं.
आम्ही शिवसेना घटनात्मकरित्या चालवली. आमच्या पक्षाची घटना होती. पक्षामध्ये आमचं बहुमत असताना आयोगाने अमित शाह यांच्या दबावाखाली हा पक्ष एकनाथ शिंदेंना 5 हजार कोटींना विकला. मी आकडा सांगतो. त्याची किंमत 5 हजार कोटी. यात निवडणूक आयोग आणि कोण कोण सामील आहेत? त्याचा हिशोब ते देतील. या प्रक्रियेत 5 हजार कोटी खर्च झाले आहेत. आमदार फोडणं, आमदार गुवाहाटीला नेणं, सुरतला नेणं, गोव्याला आणणं, निवडणूक आयोगात सेटिंग आणि बिटिंग करणं यात जनतेचे 5 हजार कोटी खर्च झाले आहेत. हा पक्ष अमित शाह यांच्या शेअर मार्केटमधून विकला गेला. निवडणूक आयोगाने त्यात दलालाची भूमिका बजावली. पक्ष विकण्यात निवडणूक आयोग हा एजंट आहे. निवडणूक आयोगाने असे चार पक्ष विकले आहेत. आमचा, पवारांचा, तृणमूल आणि मधल्या काळात अजून एक पक्ष, असे चार पक्ष विकले. लोकशाहीची विक्री निवडणूक आयोग करत असेल तर देशात उरलं काय? हा आकडा खरा आहे. पण मिंद्यांचे लोक अधिक आकडा सांगू शकतील. कुणाला किती दिले याचा मी हिशोब केला आहे, असं संजय राऊत म्हणाले.
भ्रष्टाचाराला पुरावे असतात का?
पक्ष विकला गेला याला काही पुरावे आहेत का? असा सवाल राऊत यांना करण्यात आला. त्यावर, भ्रष्टाचाराला पुरावे असतात का? एखादी घटना आणि लोकशाही विकली जात असेल तर पुरावे असतात का? त्यांनी पक्ष विकला हाच पुरावा आहे. आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात गेलो आहे. शिंदेंना हा पक्ष मेरिटवर मिळाला नाही. हा पक्ष विकला गेला. आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केला गेला. मिंद्यांनी किंमत मोजली. त्यात अमित शाह सहभागी होते, असा दावा राऊत यांनी केला.
निवडणूक आयोगाचे विचित्र युक्तिवाद
पक्ष आणि चिन्हाचा युक्तिवाद महत्त्वाचा आहे. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. त्यांच्या हयातीत उद्धव ठाकरेंना पक्ष सोपवला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात पक्षाची घटना तयार केली. ती घटना निवडणूक आयोगाला कळवली. त्याच्या रितरस पोचपावत्या आमच्याकडे आहेत. पण, हा पक्ष अलोकशाहीवादी आहे. असे विचित्र युक्तिवाद निवडणूक आयोगाने त्यांच्या निर्णयात दिले आहेत. पक्ष आणि चिन्हच महत्त्वाचे आहेत, असंही ते म्हणाले.