
टीव्ही 9 नेटवर्कच्या वतीनं ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे समिट 2026’ चं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी ‘सत्ता सम्मेलन’मध्ये बोलताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मोठा दावा केला आहे. आसामच्या जनतेला आता बदल पाहिजे, त्यामुळे यावेळी आसाममध्ये काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, आसाममधील लोकांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गैरव गोगोई यांची निवड केली आहे, ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण काँग्रेस पक्ष एकजूट झाला आहे. काँग्रेस आसाममध्ये प्रचंड मेहनत घेत आहे. तेथील लोकांना बदल हवा आहे, त्यामुळे आसाममध्ये काँग्रेसची सत्ता येईल असं डीके शिवकुमार यांनी म्हटलं आहे.
पुर्वी आसामध्ये काँग्रेसची सत्ता होती. पंरतु गेल्या दहा वर्षांमध्ये तिथे आता काँग्रेसची सत्ता नाहीये. पंरतु आता जनतेला आसाममध्ये बदल हवा आहे. नवा आणि ज्याच्यावर एकही आरोप नाही असा चेहरा राज्याला मिळावा असं तेथील जनतेला वाटत आहे, त्यामुळे यावेळी राज्यात आमचा विजय होईल असंही यावेळी शिवकुमार यांनी म्हटलं आहे.
मला भाजपवर टीका करण्याची इच्छा नाहीये, आम्ही भाजपाचं नेतृत्व आणि उमेदवारांवर देखील टीका करू इच्छित नाही, तसेच भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा आम्हाला टीका करायची नाहीये, कारण ते दिवसा स्वप्न पहात आहेत, अशा शब्दात शिवकुमार यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या 30 टक्के तिकिटांचा निर्णय मीच घेतो, असं म्हणत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसला डिवचलं होतं. यावर देखील डीके शिवकुमार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की आम्ही पण स्वप्न पहातो पण आम्ही रात्री सप्न पहातो. ते दिवसा स्वप्न पहातात, असं यावेळी शिवकुमार यांनी म्हटलं. तसेच ते काँग्रेस पक्षाबद्दल कसं काय निर्णय घेऊ शकतात? असा सवाल करतानाच आम्ही योग्य वेळ आल्यानंतर त्यांना उत्तर देऊ असा इशाराही यावेळी शिवकुमार यांनी भाजपला दिला आहे.
काँग्रेसचे सर्व हिंदू नेते हे भाजपसोबत असल्याचं देखील आसामच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. या दाव्याला देखील शिवकुमार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. हा गैरसमज आहे. काँग्रेस पक्षाचा एक वेगळा इतिहास आहे. काँग्रेसची स्वत:ची नौतिक मूल्य आहेत. काँग्रेस सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. मात्र ते फक्त हिंदूत्वावर विश्वास करतात. मात्र आम्ही हिंदू, मुस्लिम, बैद्ध असा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन पुढे जातो, आम्ही संविधानावर विश्वास ठेवतो, असं यावेळी डीके शिवकुमार यांनी म्हटलं आहे.