राहुल गांधींच्या ‘त्या’ आरोपावर ज्योतिरादित्य सिंधिया जोरदार टीका, थेट उत्तर देत उपस्थित केले सवाल
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या जोरदार टीका केली आहे. संसदमध्ये बोलू दिलं जात नाही यावर त्यांनी अनेक सवाल देखील उपस्थित केले आहेत.

Satta Sammelan 2026: टीव्ही9 नेटवर्कच्या सत्ता संमेलनात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. संसदेत बोलू दिले जात नाही, या राहुल गांधी यांच्या आरोपाला त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले.
या संमेलनात बोलताना सिंधिया यांनी संसदेत निर्माण होणाऱ्या गोंधळासाठी विरोधकांनाच जबाबदार धरले. त्यांनी सांगितले की, लोकशाहीत प्रत्येकाला संसदेत आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. हीच आपल्या लोकशाहीची ताकद आणि सुंदरता आहे. मात्र, अलीकडच्या काळात विरोधक चर्चा करण्यापेक्षा संसदेत अडथळे निर्माण करण्यात अधिक रस घेताना दिसत आहेत.
WITT 2026 सत्ता संमेलन या मंचावर बोलताना सिंधिया यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर उपरोधिक टिप्पणी केली. ‘ते स्वतःच बराच वेळ परदेशात घालवतात, मग ते कसे म्हणू शकतात की त्यांना संसदेत बोलू दिले जात नाही?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आणखी तीव्र शब्दांत टीका करत म्हटले की, ‘लोकशाहीत असे होऊ शकत नाही की संसद चालणार नाही, सभापती (स्पीकर) असणार नाही आणि फक्त तुमचेच मत चालणार. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही समान अधिकार आहेत. पण जर तुम्हाला बोलायचेच नसेल आणि फक्त गोंधळ घालायचा असेल, तर संवाद कसा होणार?’ असा देखील प्रश्न त्यांनी तिथे उपस्थित केला.
विविध मुद्द्यांवर स्पष्टीकरण
सिंधिया यांनी पुढे सांगितले की, मागील 12 वर्षांत संसद अत्यंत उत्पादक राहिली आहे. मात्र, विरोधकांचा दृष्टिकोन अनेकदा आश्चर्यचकित करणारा असतो. त्यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्र्यांनी अनेक वेळा विविध मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले आहे, तरीही विरोधक महत्त्वाच्या चर्चांपासून दूर राहतात.
त्यांनी उदाहरण देत सांगितले की, काही वेळा विरोधक अनावश्यक मुद्देही उपस्थित करतात. गेल्या वेळी स्पीकरला हटवण्याचा मुद्दा मोठ्या जोरात मांडला गेला, पण जेव्हा त्यावर चर्चा करण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनीच विषय बदलला. स्वतःच ठरवलेल्या मुद्द्यावरून माघार घेतली तर संवाद कसा होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, या संमेलनात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका करत लोकशाहीत संवाद आणि जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले.
