Iran Israel War : काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी भारताचा सच्चा मित्र इस्रायलच्या विरोधात, लेख लिहिला

Iran Israel War : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी एक लेख लिहून मिडल इस्टमधील तणावावर आपलं मत मांडलं आहे. त्यांनी इराण भारतासाठी किती महत्त्वाचा आहे, ते सांगण्याचा प्रयत्न केलाय. इस्रायलने हमास आणि इराणवर जो हल्ला केला, त्याचा निषेध केला आहे. सध्या इस्रायल-इराणमध्ये टोकाचा संघर्ष सुरु आहे.

Iran Israel War : काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी भारताचा सच्चा मित्र इस्रायलच्या विरोधात, लेख लिहिला
Sonia Gandhi
| Updated on: Jun 21, 2025 | 12:26 PM

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी इस्रायल-इराण तणावावर लेख लिहिला आहे. त्यांनी इराणवरील इस्रायली हल्ल्याचा निषेध केला आहे. मोदी सरकारच्या भूमिकेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनिया गांधींचा लेख आपला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलाय. “इराण भारताचा जुना मित्र आहे. नेहमीच भारत आणि इराणचे संबंध चांगले राहिलेत. त्यांनी इराण आणि भारताच्या मैत्रीच उदहारण देताना 1994 सालच्या जम्मू-काश्मीर मुद्दाची आठवण करुन दिली आहे, तेव्हा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगात भारताच्या विरुद्ध प्रस्ताव आणला होता. त्यावेळी इराणने भारताला साथ देऊन तो प्रस्ताव थांबवायला मदत केली होती” असं सोनिया गांधी यांनी लिहिलं आहे.

“इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणने आपल्या जुन्या शासनाच्या तुलनेत भारताला अधिक सहकार्य केलं. 1979 साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. मात्र त्याआधीच्या इराणी शासनाने 1965 आणि 1971 च्या युद्धात पाकिस्तानची साथ दिली होती” याकडे सोनिया गांधी यांनी लेखात लक्ष वेधलय.

‘भारताकडे शांतता आणि संवादाचा पूल बनवण्याची कूटनितीक ताकद’

“मागच्या काही दशकांपासून भारत आणि इस्रायलचे रणनितीक संबंध मजबूत होत आहेत. अशा परिस्थितीत भारताकडे शांतता आणि संवादाचा पूल बनवण्याची कूटनितीक ताकद आणि नैतिक जबाबदारी आहे. हा फक्त अमूर्त सिद्धांत नाहीय, तर पश्चिम आशियाई देशात राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यांच्या सुरक्षेला गांभीर्याने घेऊन सरकारला आपली परदेशी कूटनितीची स्थिती मजबूत करावी लागेल” असं सोनिया गांधी यांनी लिहिलं आहे.

‘अजूनही उशीर झालेला नाही’

“इस्रायलने गाजामध्ये विद्धवंस घडवला. आता इराणवर सतत हल्ले सुरु आहेत. या परिस्थितीत भारत सरकारचा मौन दाखवून देतं की, सरकार आपल्या नैतिक आणि कूटनितीक परंपरांपासून मागे हटत आहे. यातून फक्त भारताच्या आवाजाची कमतरता दिसून येत नाही, तर हे भारताच्या मुल्यांच आत्मसमर्पण आहे” असं सोनिया गांधी यांनी लिहिलय. लेखाच्या शेवटी सोनिया गांधींनी मोदी सरकारला सांगितलय की, “अजूनही उशीर झालेला नाही. भारताने आपली जबाबदारी निभावली पाहिजे. भारताने पश्चिम आशियाई देशांमध्ये संवादाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे”


इस्रायल भारताचा सच्चा मित्र का?

इस्रायलवरुन भारतात दोन मतप्रवाह आहेत. पण इस्रायलने संकटकाळात नेहमीच भारताची मदत केली आहे. 1999 साली कारगिल युद्धाच्यावेळी इस्रायलने लेझर गाईडेड बॉम्ब मिराज फायटर विमानात फिट करण्यासाठी भारताची मदत केली होती. त्यामुळेच कारगिलच्या उंच टेकड्यांवर अचूक हवाई हल्ले करता आले होते. आज भारताने अनेक अत्याधुनिक शस्त्र इस्रायलकडून विकत घेतली आहेत.