RSS : संत शिरोमणी सद्गुरु श्री रविदास जी यांची 650 वी जयंती, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांचे भाषण

RSS : संत शिरोमणी सद्गुरु श्री रविदास जी यांच्या 650 व्या जयंती निमित्त RSS चे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

RSS : संत शिरोमणी सद्गुरु श्री रविदास जी यांची 650 वी जयंती, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांचे भाषण
RSS
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 14, 2026 | 3:07 PM

संत शिरोमणी सद्गुरु श्री रविदास जी यांच्या 650 व्या जयंती निमित्त RSS चे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संत शिरोमणी सद्गुरू श्री रविदासजी यांच्या 650 व्या जयंती वर्षानिमित्त त्यांना श्रद्धासुमन अर्पण करतो. आपली महान संतपरंपरा ही ईश्वराने भारताला दिलेली एक अद्वितीय देणगी आहे. आपल्या दीर्घ इतिहासाच्या प्रवाहात या महान संतपरंपरेने समाजात ईश्वरभक्ती व उपासनेची भावना जागृत केलीच, परंतु त्याचबरोबर सामाजिक कुरीती आणि भेदभाव दूर करत समरस समाज घडविण्याचे प्रयत्नही केले. तसेच परकीय शासकांच्या अत्याचारांविरुद्ध संघर्षासाठी समाजाला जागृत आणि सक्षम बनविण्याचे कार्यही केले.

या महान संतपरंपरेत संत श्री रविदासजी यांचे विशेष स्थान आहे. त्यांचे कर्मशील जीवन आणि कार्य आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. गृहस्थाश्रमात राहूनही सांसारिक मोहापासून अलिप्त राहणे, साधुसंतांबद्दल श्रद्धा ठेवणे आणि दीन-दुबळ्यांची सेवा करणे हा त्यांचा स्वभाव होता, जो त्यांच्या आध्यात्मिकतेचे प्रतीक होता. त्यांनी आपल्या जीवनातून समाजात श्रमाची प्रतिष्ठा आणि शुद्ध, सात्विक व पारदर्शक आचरणाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले.

संत श्री रविदासजी हे भक्तीच्या प्रवाहातील महान संत होते. त्यांनी समाजात नवचैतन्य निर्माण केले. जन्मावर आधारित उच्च-नीच भेद त्यांनी नाकारला आणि आचरणालाच श्रेष्ठतेचे मापदंड मानले. समाजाला रूढी आणि कुरीतींपासून मुक्त करण्यासाठी, कालबाह्य परंपरांचा त्याग करून काळानुसार आवश्यक सामाजिक परिवर्तन स्वीकारण्यासाठी समाजमन तयार करण्यात त्यांची ऐतिहासिक भूमिका होती. त्यांच्या विचारांचे महत्त्व ओळखून श्री गुरु ग्रंथ साहिब मध्ये त्यांच्या 41 वाण्या ‘शब्द’ स्वरूपात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

सामान्य कुटुंबातून आलेल्या संत श्री रविदासजी यांच्या ईश्वरभक्ती, सेवाभाव आणि समाजाबद्दलच्या निष्कपट प्रेमामुळे काशीतील विद्वानांसह समाजातील सर्व स्तरांनी त्यांच्या महानतेला मान्यता दिली. काशी नरेश, झाली राणी आणि मीराबाई यांसारख्या राजघराण्यातील व्यक्तींनीही त्यांना आपला गुरु मानले. गुरु आणि शिष्या म्हणून संत श्री रविदासजी आणि मीराबाई यांचे नाते निर्गुण व सगुण भक्तीपरंपरांच्या संगमाचे प्रतीक आहे, तसेच जातिभेद मानणाऱ्यांसाठी आदर्श धडा आहे.

मुस्लिम आक्रमणांच्या त्या कठीण काळात भक्तीची निर्मळ धारा प्रवाहित ठेवत संत श्री रविदासजी यांनी धर्माच्या श्रेष्ठतेची घोषणा केली आणि लोकांना धर्मपालनासाठी प्रेरित केले. त्यांना मतांतरित करून मुस्लिम बनविण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु त्यांच्या भक्ती आणि आध्यात्मिक साधनेने प्रभावित होऊन त्यांना मतांतरित करण्याचा प्रयत्न करणारेच त्यांच्या अनुयायांमध्ये सामील झाले.

आजच्या काळात विविध विभाजनकारी शक्ती समाजाला वर्ग आणि जात या आधारावर विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी पूज्य संत श्री रविदासजी यांच्या जीवनसंदेशाचा खरा अर्थ समजून आपण सर्वांनी देश आणि समाजाच्या एकात्मतेसाठी कार्य करण्याचा संकल्प करणे अत्यंत आवश्यक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us