वाझे प्रकरणामुळे आघाडी सरकार धोक्यात?; शरद पवारांचं थेट वक्तव्य!

| Updated on: Mar 16, 2021 | 7:48 PM

सचिन वाझेप्रकरणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच थेट भाष्य केलं आहे. (thackeray government strong and stable, says sharad pawar)

वाझे प्रकरणामुळे आघाडी सरकार धोक्यात?; शरद पवारांचं थेट वक्तव्य!
शरद पवार
Follow us on

नवी दिल्ली: सचिन वाझेप्रकरणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच थेट भाष्य केलं आहे. एका इन्स्पेक्टरचा राज्यावर काही परिणाम होईल असं मला वाटत नाही, असं सांगत शरद पवार यांनी ठाकरे सरकारला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळाच आज दिला. (thackeray government strong and stable, says sharad pawar)

शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले केरळचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार पीसी चाको यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. त्यानंतर पवारांनी मीडियाशी संवाद साधला. दोन दिवसांपूर्वी वाझे प्रकरण हा लोकल मुद्दा असल्याचं सांगून त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पवारांना आज याच मुद्द्यावर थेट भाष्य करावं लागलं. वाझे प्रकरणामुळे राज्य सरकारवर काही परिणाम होणार आहे का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावेळी एका इन्स्पेक्टरमुळे सरकारवर काही परिणाम होईल असं वाटत नाही. वाझे प्रकरणाचा सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, असं पवार म्हणाले.

आघाडीत मतभेद नाही

यावेळी सचिन वाझेंची शिवसेनेकडून करण्यात येत असलेली पाठराखण आणि हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांना आलेलं अपयश यामुळे आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावेळी महाविकास आघाडीत काहीही मतभेद नाहीत. आम्ही सर्व मिळून काम करत आहोत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सर्वजण काम करत आहेत. काही गोष्टी इकडच्या तिकडच्या होतात. त्यातून आम्ही मार्ग काढतो, असं पवार म्हणाले.

एनआयएला सहकार्य

अँटालिया प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहे. त्यामुळे त्यांना सहकार्य करणं आमचं काम आहे. त्यांच्या कामात अडचण येऊ नये यावर आमचा भर आहे, असंही त्यांनी सांगितलं.

अनिल देशमुखांना अभय

यावेळी पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीनचिट दिली. या प्रकरणात गृहमंत्र्याने चांगलं काम केलं आहे. चुकीचं काम करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण चांगलं हाताळलं आहे, असं सांगत पवारांनी देशमुख यांना एकप्रकारची क्लीनचिटच दिली आहे. पवारांनी देशमुखांना अभय दिलं असलं तरी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांच्या उचलबांगडी विषयी बोलण्यास नकार दिला. सिंग यांना ठेवायचं की नाही हे मुख्यमंत्री ठरवतील. तो त्यांचा अधिकार आहे. कुणाला ठेवायचं, कुणाला नाही ठेवायचं, कोणत्या अधिकाऱ्यांकडे काय जबाबदारी द्यायची हा मुख्यमंत्र्यांचा विषय आहे, असंही ते म्हणाले. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी विविध विषयावर चर्चा करता, तुमचा सल्ला घेतला जातो, असं पवारांना विचारण्यात आलं. तेव्हा, मी फक्त विकासाच्या धोरणात्मक विषयांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो. कोणत्या अधिकाऱ्याला ठेवायचं, कुणाला हटवायचं या गोष्टीत मी लक्ष घालत नाही. मला त्यात इंटरेस्टही नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. (thackeray government strong and stable, says sharad pawar)

दोन दिवसांपूर्वी पवार काय म्हणाले?

दोन दिवसांपूर्वी पवारांना सचिन वाझे प्रकरणावर प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावर हा लोकल मुद्दा आहे. त्याबाबत मी बोलू शकत नाही, असं ते म्हणाले होते. त्यानंतर काल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी वाझे प्रकरणावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. (thackeray government strong and stable, says sharad pawar)

 

संबंधित बातम्या:

21व्या वर्षी साखर कारखान्याचं अध्यक्षपद, उत्कृष्ट संसदपटू; शंभूराज देसाईंविषयी हे माहीत आहे का?

VIDEO : राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत मोर थुई थुई नाचले, बोलता बोलता थांबून शरद पवारही हसले!

‘त्या’ गाडीविषयी कुठलंही रेकॉर्ड ठेवू नये, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं, उपनिरीक्षक टाकेंचा धक्कादायक खुलासा

(thackeray government strong and stable, says sharad pawar)