त्या’ किल्ल्यात खजिना खरंच नव्हता? मग दिल्ली-जयपूर हायवे रात्रभर बंद का होता? ट्रकमध्ये काय वाहून नेलं
राजस्थानमधील जयपूरचा जयगड किल्ल्यात 1976 मध्ये आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खजिन्याच्या शोधासाठी चक्क सैन्य पाठवले होते, अशी चर्चा आजही रंगते. सरकारने खजिना नसल्याचं सांगितलं, पण रात्री ट्रकमधून काय वाहून नेण्यात आलं? मध्य रात्री दिल्ली-जयपूर महामार्गावर झालेली लष्करी हालचाल कशाची होती? अशा मथळ्याच्या बातम्या त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या.

जमीन खोदून काढलेला खजिना आणि रात्रीच्या वेळी दिल्ली-जयपूर महामार्गावर झालेली लष्करी हालचाल… ही गोष्ट आहे जयपूरच्या त्या गुप्त खजिन्याची, ज्याने 50 वर्षांपूर्वी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. ‘राजा मानसिंगचा खजिना’ शोधण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेली ती मोहीम यशस्वी झाली की सरकार रिकाम्या हाती परतले? आजही या रहस्यावरून पडदा उठलेला नाही. भारताच्या इतिहासात अनेक रहस्यमय खजिन्यांच्या गोष्टी आहेत, पण जयपूरच्या जयगड किल्ल्यातील खजिन्याइतकी चर्चा कशाचीच झाली नसेल. या रहस्याची मुळे मुघल काळातील राजा मानसिंग यांच्याशी जोडलेली आहेत.
राजा मानसिंग आणि खजिन्याचा इतिहास
राजा मानसिंग (प्रथम) हे अकबराच्या नवरत्नांपैकी एक आणि महान सेनापती होते. असे मानले जाते की, 1581 मध्ये जेव्हा त्यांनी अफगाणिस्तानमधील काबूल मोहीम फत्ते केली, तेव्हा तिथून त्यांनी अमाप संपत्ती आणली होती. ‘इतिहासातील काही नोंदींनुसार’ हा सर्व खजिना त्यांनी अकबराला न देता जयगड किल्ल्यातील गुप्त टाक्यांमध्ये दडवून ठेवला होता.
1976 ची लष्करी मोहीम
आणीबाणीच्या काळात, जून 1976 मध्ये या खजिन्याची चर्चा पुन्हा सुरू झाली. ‘BBC’ आणि ‘द टाइम्स ऑफ इंडिया’मधील जुन्या रिपोर्टनुसार, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जयगड किल्ल्यात खजिना शोधण्यासाठी ‘आर्मी’ तैनात केली होती. सलग पाच महिने हे शोधकार्य सुरू होते. मेटल डिटेक्टर्स आणि प्रगत उपकरणांचा वापर करून किल्ल्याचा कानाकोपरा तपासला गेला.
खरोखरच खजिना सापडला का?
अधिकृत सरकारी नोंदीनुसार, या मोहिमेत कोणताही खजिना सापडला नाही. सरकारने हे शोधकार्य थांबवले आणि जाहीर केले की तिथे केवळ पाणी साठवण्याच्या टाक्या होत्या. मात्र, ‘द इंडियन एक्सप्रेस’मधील काही जुन्या लेखांनुसार, ज्या दिवशी हे शोधकार्य संपले, त्या दिवशी दिल्ली-जयपूर महामार्ग सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आला होता. अनेकांचा असा दावा आहे की, लष्कराच्या मोठ्या ट्रक्समधून हा खजिना गुप्तपणे दिल्लीला नेला गेला. मात्र, जयपूर राजघराण्याने आणि तत्कालीन सरकारने या दाव्यांचा नेहमीच इन्कार केला आहे.
पाकिस्तानचाही होता दावा
या प्रकरणातील सर्वात रंजक वळण म्हणजे, या मोहिमेदरम्यान पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांनी इंदिरा गांधींना पत्र लिहून या खजिन्यात पाकिस्तानचाही वाटा असल्याचे म्हटले होते. फाळणीच्या करारानुसार या संपत्तीवर आमचाही हक्क आहे, असा त्यांचा दावा होता. पण भारताने तो फेटाळून लावला.