अय्यो! बिर्याणी खाल्ल्याने मर्दानगी कमी होतेय, टीएमसी नेत्याचं अजब विधान; दोन दुकानांना ठोकलं टाळं
सर्व तरुणांच्या तक्रारी एक सारख्याच होत्या. बिर्याणी अधिक चविष्ट आणि रुचकर होण्यासाठी दुकानदार त्यात विशिष्ट प्रकारच्या मसाल्याचा वापर करत आहेत. पण या मसाल्यामुळे मर्दानगी कमी होत आहे.
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये सध्या बिर्याणीवरून वाद निर्माण झाला आहे. येथील कूचविहारमध्ये (Cooch Behar) प्रशासनाने बिर्याणीचे दोन दुकाने (Biryani Shop) बंदही केली आहेत. या दुकानात बिर्याणी खाणाऱ्यांची मर्दानी शक्ती कमी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दुकानातील बिर्याणी खाल्ल्याने मर्दानगी कमी होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या होत्या. त्यानंतर कूचविहार नगर पालिकेच्या टीमने तृणमूल नेते रबिंद्रनाथ घोष (Rabindra Nath Ghosh) यांच्या उपस्थितीत या दोन्ही दुकानातील सँपल घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवले आहे. तसेच दुकान सील करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या दोन्ही दुकानाच्या मालकांकडे ट्रेड लायसन्स नव्हतं.
टीएमसीचे नेते रबिंद्रनाथ घोष यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेक दिवसांपासून या दुकानांबाबत तक्रारी येत होत्या. हे दुकानदार त्यांच्या बिर्याणीत वेगळाच मसाला वापर असल्याचा आरोप आहे. या मसल्याची बिर्याणी खाल्ल्यानंतर मर्दानी शक्ती कमी होत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून येऊन या परिसरात अनेक लोक बिर्याणी विकत आहेत. त्यामुळे रात्रभर या परिसरात गोंधळ आणि गोंगाट असतो. वारंवार मिळणाऱ्या तक्रारीनंतर अखेर नगरपालिकेने या दुकानांवर कारवाई केली आहे, असं रबिंद्रनाथ घोष यांनी सांगितलं.
बिर्याणीतील मसाल्याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर या दुकानदारांनी कोणतंही समाधानकारक उत्तर दिलं नाही. उलट इकडच्या तिकडच्या गोष्टी करत दुकानदार नगरपालिकेच्या टीमचं लक्ष विचलीत करत होते. त्यानंतर प्रशासनाच्या टीमने त्यांच्याकडे ट्रेड लायसन्स मागितलं. दुकानदार ते सुद्धा दाखवू शकले नाहीत. त्यामुळे पालिकेच्या टीमने हे दुकान सील करण्याचा निर्णय घेतला. तसेच अशा प्रकारे अन्य दुकानांवर कारवाई करण्याचा इशाराही पालिकेच्या टीमने दिल्याचं त्यांनी सांगितलं.
या परिसरातील तरुण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या दुकानांबाबत तक्रारी करत होते. सर्व तरुणांच्या तक्रारी एक सारख्याच होत्या. बिर्याणी अधिक चविष्ट आणि रुचकर होण्यासाठी दुकानदार त्यात विशिष्ट प्रकारच्या मसाल्याचा वापर करत आहेत. पण या मसाल्यामुळे मर्दानगी कमी होत आहे. गेल्या चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. दुसऱ्या राज्यातून आलेल्या लोकांची या परिसरात सर्वाधिक दुकाने आहेत, असंही त्यांनी सांगितलं.