
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे. ट्रम्प यांनी लावलेला टॅरिफ बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टात केस हरल्यानंतर आता ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येताच दुसऱ्याच दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफमध्ये दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला, ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाही तर त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी जगावर 15 टक्के टॅरिफचा बॉम्ब फोडला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणाचा भारतावर काय परिणाम होणार? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी आता समोर आली आहे.
परराष्ट्र धोरण तज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञांच्या मते डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढवलेल्या टॅरिफचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाहीये. हेलियोस कॅपिटलचे फाउंडर समीर अरोरा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने वाढवलेल्या टॅरिफवर बोलताना म्हटलं की, डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलेल्या या पावलामुळे भारताचं कोणतंही मोठं नुकसान होण्याची शक्यता नाही. कारण भारताला पेमेंट सिस्टमच्या भीन्नतेमुळे ताकद मिळेल. त्यामुळे या टॅरिफ धोरणाचा भारतामधील अंतर्गत स्थितीवर किंवा जीडीपीवर काही खास परिणाम होईल असं वाटत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील जवळपास 90 टक्के देशांवर टॅरिफ लावला आहे. त्यामुळे आपली स्पर्धा आता अशा देशांसोबत असणार आहे, ज्यांच्यावर देखील टॅरिफ आहे, जागातील सर्वच देशांवर टॅरिफ लावण्यात आल्यामुळे याचा निर्यातीमध्ये फार फटका बसेल असं वाटत नाही, असं समीर अरोरा यांनी म्हटलं आहे. तसेच हा जो टॅरिफ आहे तो केवळ 150 दिवसांपूर्तताच मर्यादीत असल्यामुळे तो नंतर वाढणार की नाही हे देखील स्पष्ट नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ट्रम्प यांची टॅरिफ वाढवण्याची घोषणा
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या न्यायालयाने दणका दिल्यानंतर त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती, हा अपमानजनक निर्णय असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, याविरोधात आपल्याकडे बी प्लान तयार असल्याचं देखील ते म्हणाले होते, आणि न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्यांनी टॅरिफ दहा टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान त्यानंतर काही वेळातच त्यांनी टॅरिफ 15 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला.