जंतर मंतरवर आता आंदोलनाला बंदी? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
जंतर -मंतरवर होणाऱ्या आंदोलनांवर बंदी घालावी यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकार आणि दिल्लीचे पोलीस कमिश्नर यांच्याकडे उत्तर मागितलं आहे.

जंतर -मंतरवर होणाऱ्या आंदोलनांवर बंदी घालावी यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकार आणि दिल्लीचे पोलीस कमिश्नर यांच्याकडे उत्तर मागितलं आहे. सुरक्षा तसेच इतर काही कारणांमुळे आता जंतर -मंतर आंदोलनासाठी योग्य नसल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्याने आपल्या या याचिकेमध्ये काही दिवसांपूर्वी जंतर -मंतरवर झालेल्या कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आणि संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चाचा देखील उल्लेख केला आहे. तसेच अरविंद केजरीवाल यांच्याकडून E20 संदर्भात करण्यात आलेल्या घोषणेचा देखील संदर्भ देण्यात आला आहे.
याचिकाकर्त्याच्या वकिलाने काय केला दावा?
सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलाकडून असा दावा करण्यात आला की, अलिकडच्या काळात या मैदानावर ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहेत, खास करून 20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने संसदेवर मोर्चा काढाण्यात आला, त्यामध्ये मोठा राडा झाला, भविष्यात अशा घटना होऊ नयेत, यासाठी कोर्टाचा आदेश महत्त्वाचा आहे. दरम्यान यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून E20 च्या मुद्द्यावर आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या घोषणेचा उल्लेख देखील करण्यात आला आहे, केजरीवाल यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा नेण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे 20 जुलैला जे घडलं तसं पुन्हा घडू नये, यासाठी जंतर -मंतरवर होणाऱ्या आंदोलनांवर बंदी घालावी अशी मागणी वकिलाकडून करण्यात आली आहे.
दरम्यान यावर बोलताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलं की हे प्रकरण महत्त्वाचं आहे. या प्रकरणातून कसा मार्ग काढायचा हे प्रशासनाला चांगलं माहिती आहे, जर त्यांना मार्ग काढता आला नाही, तर तुम्ही आमच्याकडे या आम्ही योग्य तो निर्णय देऊ असं यावर बोलताना सूर्यकांत यांनी म्हटलं आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर -मंतरवर आंदोलन करण्यात आलं होतं, तसेच संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला होता, या मोर्चाला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं.
