15 August and 26 January Difference : ध्वजारोहण आणि झेंडावंदन यात फरक काय? 26 जानेवारीला नेमकं काय करतात ?
15 August and 26 January Difference : 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी आणि 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या समारंभात काही मूलभूत फरक आहेत. एक दिवस असा असतो जेव्हा पंतप्रधान ध्वजारोहण समारंभात सहभागी होतात, तर दुसरा दिवस असतो जेव्हा राष्ट्रपती समारंभाचे केंद्रबिंदू असतात. दोन्ही दिवशीसमारंभांची ठिकाणे पूर्णपणे भिन्न असतात. चला जाणून घेऊया.

15 ऑगस्ट 1947 रोजी पंडित नेहरूंनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले होते, तर राष्ट्रपतींनी 26 जानेवारी रोजी ध्वजवंदन केलं. दोन्ही प्रसंग लाल किल्ल्याच्या तटबंदीवर आणि राजपथावर होतात.

15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण समारंभ होतो. 1947 मध्ये याच दिवशी भारतातील ब्रिटिश राजवटीचा ध्वज उतरवण्यात आला आणि राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. जेव्हा राष्ट्रध्वज खालून ध्वजस्तंभाच्या वरच्या बाजूला उंचावला जातो तेव्हा त्याला ध्वजारोहण म्हणतात.

26 जानेवारी, म्हणजेच प्रजासत्ताक दिनी, ध्वजस्तंभावर आधीच ठेवलेला ध्वज फडकवला जातो. या दिवशी ध्वजवंदन म्हणजेच झेंडावंदन केलं जातं. अनेक ठिकाणी, फुलांचा वर्षाव व्हावा म्हणून ध्वजस्तंभाला फुलांच्या पाकळ्या देखील बांधल्या जातात.

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी दोन्ही समारंभाची ठिकाणे : 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्यदिनी ब्रिटिश ध्वजाच्या जागी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर प्रथमच भारतीय तिरंगा ध्वज फडकवण्यात आला आणि तेव्हापासून दरवर्षी लाल किल्ल्यावर ध्वज फडकवला जातो. तर 26 जानेवारी रोजी, राष्ट्रपती भवनाजवळील कर्तव्य पथ (पूर्वी राजपथ म्हणून ओळखले जाणारे) येथे समारंभ आयोजित केला जातो, जिथे परेड सुरू होण्यापूर्वी झेंडावंदन केले जाते.

पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची भूमिका : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. तेव्हापासून, दरवर्षी भारताचे पंतप्रधान येथे ध्वजारोहण करतात आणि नंतर राष्ट्राला संबोधित करतात. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन केलं. तेव्हापासून, भारताचे राष्ट्रपती दरवर्षी या दिवशी राजपथावर झेंडावंदन करतात, त्यानंतर प्रजात्ताक दिनाच्या भव्य परेडची सुरुवात होते.

ध्वज फडकवण्याचे नियम : भारतातील सामान्य नागरिक आपल्या घरी राष्ट्रध्वज फडकवू शकतात का? हो, ते असं करू शकतात! पण काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. भारतीय ध्वज संहिता 2002 मध्ये असे म्हटले आहे की कोणतीही व्यक्ती, राष्ट्रध्वज फडकावू शकते. तुम्ही तो कधीही फडकावू शकता, परंतु ध्वजाचा आदर राखला गेला पाहिजे. मात्र नंतर ध्वज संहितेत काही बदल करण्यात आले. सूर्यास्तानंतर तिरंगा फडकवता येत नाही. तो खाली उतरवावा लागतो.