Ajit Pawar Death in Plane Crash : आमचं गाव पोरकं झालं… अजितदादांच्या निधनाचं वृत्त येताच अनेक गावात बंद
अजित पवारांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बारामती येथील विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने अख्खा महाराष्ट्र हादरला. या दुर्दैवी घटनेमुळे बारामती, सासरवाडी तेर, जन्मभूमी अहिल्यानगर तसेच पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक गावे व शहरे स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून नेत्याला आदरांजली वाहत आहेत, ज्यात कल्याणचाही समावेश आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज अपघाती निधन झालं. बारामतीमध्ये त्यांचं विमान लँडिंगदरम्यान क्रॅश होऊन मोठ्ठा स्फोट झाला आणि आगीच्या ज्वाळा उसळल्या. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील जमांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे फक्त बारामतीकरच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी येताच संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेनंतर राज्यातील अनेक गावात बंद पुकारण्यात आला. अनेक गावातील गालकऱ्यांनी स्वत:हून पुढे येत बंदचा निर्णय घेतला.

अजित पवारांची सासुरवाडी असलेल्या धाराशिवच्या तेर गावात संपूर्ण गाव बंद ठेवत सार्वजनिक दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अजित पवारांच्या जाण्याने आमचं गाव पोरक झालं अशा भावना अजित पवारांची सासरवाडी तेर गावातील ग्रामस्थांनी भावना व्यक्त केल्या.

व्यापारी वर्गाने आपापली दुकाने बंद करत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. तसेच या घटनेनंतर गावातील शाळाही सोडून देण्यात आल्या असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

तर अजित पवार यांच्या जाण्याने त्यांचं आजोळ असलेल्या अहिल्यानगरच्या देवळाली प्रवरा मध्येही शोकाकुल वातावरण आहे. देवळाली प्रवरा गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. याच गावात अजित पवार यांचा जन्म झाला होता.

अवघ्या 3 महिन्यांपूर्वीच अजित पवार यांनी आजोळात दौरा केला होता. सगळ्या मामांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच गावकरी हादरलेच. अजित पवारांच्या आजोळात नागरिकांची गर्दी झाली. अजित पवारांचे मामेबंधू चंद्रशेखर कदम यांना अश्रू अनावर झाले होते.

अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्याच्या निधनानंतर बीड जिल्ह्यातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पालकमंत्री असलेले अजित दादा गेल्याने जिल्हाभर शोककळा पसरली आहे.

संपूर्ण बीड शहर बंद ठेवून बीड बीड शहराला आणि जिल्ह्याला शिस्त घालून देणाऱ्या अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अजितदादांच्या जाण्याने बीड जिल्ह्याचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

कल्याणमध्ये शोककळा पसरली आहे. अजित पवार यांना व्यापारी व शिवसेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. वडवली, अटाळी आणि आंबिवली परिसरातील व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवून शोक व्यक्त केला . माजी नगरसेवक दुर्योधन पाटील आणि युवा सेना पदाधिकारी वैभव पाटील यांच्याकडून आदरांजली वाहण्यात आली. शिवसेना शाखा कल्याणमधील स्थानिक कार्यकर्त्यांतर्फे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. तर अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने वडवली-अटाळी परिसरात शांतता आहे, संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण आहे. सामाजिक कार्यातील योगदानाचे स्मरण करत विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.