31 कलाकार असणारं सुपरहिट गाणं, पण अमिताभ बच्चन यांचा नव्हता गाण्यात समावेश, कारण ऐकूनच…
9 मिनिट 7 सेकंदाचं प्रचंड रोमँटिक आणि सुपरहिट गाणं, ज्यामध्ये होते 31 कलाकार, पण अमिताभ बच्चन या गाण्यामध्ये हजर नव्हते. नेमकं काय होतं कारण?

बॉलिवूडमधील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातील ‘दीवानगी-दीवानगी’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या गाण्याची खासियत म्हणजे तब्बल 31 बॉलिवूड कलाकारांना एका फ्रेममध्ये आणण्याचा पराक्रम दिग्दर्शिका फराह खान यांनी केला होता.

मात्र या गाण्यात अमिताभ बच्चन यांची अनुपस्थिती अनेकांच्या लक्षात आली होती. आता यामागचे खरे कारण स्वतः फराह खान यांनी उघड केले आहे. अलीकडेच IFTDA च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत पल्लवी जोशी यांच्याशी संवाद साधताना फराह खान यांनी या गाण्याशी संबंधित अनेक आठवणींना उजाळा दिला.

त्यावेळी त्यांनी सांगितले की, ‘दीवानगी-दीवानगी’ गाण्याचे चित्रीकरण सुरू असतानाच बच्चन कुटुंबात मोठ्या लग्नाची तयारी सुरू होती. फराह खान म्हणाल्या की, त्या काळात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाची लगबग सुरू होती. त्यामुळे अमिताभ बच्चन संपूर्णपणे कौटुंबिक कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांना या गाण्याच्या चित्रीकरणासाठी वेळ देता आला नाही.

यावेळी फराह खान यांनी विनोदी शैलीत आणखी एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला संपूर्ण चित्रपटसृष्टीला निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे ज्यांना लग्नाचे आमंत्रण मिळाले नव्हते, ते अनेक कलाकार आमच्या ‘दीवानगी-दीवानगी’ गाण्याच्या शूटिंगसाठी उपलब्ध झाले.

एका अर्थाने बच्चन कुटुंबाच्या त्या खासगी विवाहसोहळ्याचा आम्हाला मोठा फायदा झाला आणि इतके सारे स्टार्स एका गाण्यासाठी एकत्र आणणे शक्य झाले. या गाण्यात 31 कलाकार झळकले होते. त्यामुळे हे गाणे बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक स्टारकास्ट असलेल्या गाण्यांपैकी एक मानले जाते.