
स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली ‘वचन दिले तू मला’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मालिकेला भरभरून प्रेम मिळत आहे. न्यायासाठी लढणारी, ध्येयवेडी आणि आत्मविश्वासू अॅडव्होकेट ऊर्जा शिंदे तिच्या आयुष्यातील पहिली महत्त्वाची केस लढण्यासाठी सज्ज होत आहे.

पहिली केस लढण्यापूर्वी ऊर्जाने प्रसिद्ध सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. न्यायाच्या वाटेवर पाऊल टाकताना ऊर्जासाठी ही भेट अतिशय महत्त्वाची ठरली.

या भेटीविषयी सांगताना ऊर्जाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का सरकटे म्हणाली, "उज्वल निकम सरांना भेटून मनापासून आनंद झाला. त्यांनी दिलेला वेळ, प्रेमळ शब्द आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. हा क्षण मी कायम लक्षात ठेवेन."

खास बाब म्हणजे, निष्णात वकील हर्षवर्धन जहागिरदार यांच्या विरोधात ऊर्जा न्यायालयात उभी राहणार आहे. ऊर्जाची ही पहिली केस केवळ एक खटला न राहता, न्यायासाठीचा एक निर्णायक संघर्ष ठरणार आहे. या संघर्षात ऊर्जा स्वतःला कशी सिद्ध करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हर्षवर्धन जहागिरदार हा कायद्याची उत्तम जाण असणारा निष्णात वकील. त्यांचं व्यक्तिमत्त्व इतकं प्रभावशाली आहे की प्रतिस्पर्धी वकील त्यांना घाबरतात. या मालिकेत अभिनेते मिलिंद गवळी ही भूमिका साकारत आहेत.