
राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून विशेषतः मुंबई, पुणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. प्रशासनाने सतर्कता ठेवून मदतकार्य करावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

पुण्याच्या भिमाशंकर परिसरात अतिवृष्टीचा हाहाकार पाहायला मिळाला असून डोंगरकड्यावरील ओढे नाले दुथडी भरुन वाहिल्याने भिमानदीला पहिल्याच पावसात पूर आला आहे

भिमानदीवरील बंधारे, पुल पाण्याखाली गेले असून अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे भात खाचरांचे नुकसान झाले आहे. भिमाशंकर भोरगिरी परिसरात शेतातील घरांसह पशुधनाचंही नुकसान झालं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेटफळगढे गावात पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचनादेखील दिल्या.

पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये, तसेच कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेवर आणि प्रभावी पावले उचलावी, असे निर्देश त्यांनी दिले.

पुण्याच्या भीमाशंकर परिसरात रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. खेड तालुक्यातील पाभे गावाचा संपर्क तुटला आहे. रात्रभर पाऊस पडत असल्याने पूलवजा बंधारा पाण्याखाली गेला आहे.

मी गेली 35 वर्षे काम करतोय. अनेक उन्हाळे पावसाळे बघितले आहेत. आमच्यापेक्षा जास्त बघणारे देखील आहेत. पण कधी मे महिन्यामध्ये असा पाऊस पडलेला मी बघितला नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

पावसामुळे अनेक घरांची पडझड झाल्याचं पहायला मिळत आहे.