सत्य घटनेवर आधारित जबरदस्त सीरिज; मराठमोळे कलाकार अन् आयएमडीबीवर 9 रेटिंग
या मराठी वेब सीरिजला आयएमडीबीवर उत्तम रेटिंग मिळाली आहे. अभिनेता भूषण प्रधान यामध्ये मुख्य भूमिकेत असून सत्य घटनांवर आधारित या सीरिजची कथा आहे. एकूण दहा एपिसोड्सची ही सीरिज तुम्ही या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा विषय येतो, तेव्हा भगत सिंग, चंद्रशेखर आझाद यांसारख्या शूरवीरांचा उल्लेख आवर्जून होतो. मात्र एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात महाराष्ट्रात एक अशी ठिणगी पेटली होती, जिने ब्रिटीश राजवटीचा पायाच हादरवून टाकला होता. तीन भावांनी मिळून रँड या इंग्रज अधिकाऱ्याचा वध केलेला.

पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातलं होतं. त्याचवेळी रँडची नेमणूक पुण्यात झाली होती. स्वच्छतेच्या नावाखाली ब्रिटीश सैनिक घरात घुसत, गैरवर्तन करत, मालमत्तेचं नुकसान करत आणि लोकांच्या धार्मिक भावना दुखावत. अत्यंत जुलूमाने प्लेगवर उपाययोजना सुरू केल्याचा राग पुण्यातील अनेकांना होता. याच अत्याचारांना कंटाळून तीन भावांनी रँडच्या वधाची योजना आखली.

ही संपूर्ण थरारक ऐतिहासिक घटना या वेब सीरिजमध्ये चित्रित करण्यात आली आहे. चाफेकर बंधूंवर बेतलेल्या या वेब सीरिजचं नाव 'गोंद्या आला रे' असं आहे. या सीरिजला आयएमडीबीवर दहापैकी 9 अशी दमदार रेटिंग मिळाली आहे. अंकुर काकरकर दिग्दर्शित या दहा भागांच्या वेब सीरिजमध्ये चाफेकर बंधूंचं बलिदान आणि कमिश्नर रँडच्या हत्येमागील संपूर्ण रणनिती दर्शविण्यात आली आहे.

चाफेकर बंधूंनी इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी काहीतरी करायला हवं यावर विचार केला. त्यातूनच तरुणांचं मंडळ सुरू झालं, बलोपासना वगैरे प्रकार सुरू झाले आणि रँडला मारण्याचा कट शिजला. राणीच्या कार्यक्रमावरून येणाऱ्या रँडची शहानिशा करून त्याच्या येण्याची वार्ता देण्यासाठी ठोकलेली 'गोंद्या आला रे..' ही आरोळी आजही सर्वांना आठवते. याचवरून सीरिजचं नाव ठेवण्यात आलं.

या वेब सीरिजमध्ये अभिनेता भूषण प्रधानने दामोदर चाफेकर, क्षितीश दातेनं बाळकृष्ण आणि शिवराज वायचळने वासुदेव यांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेते सुनील बर्वे हे लोकमान्य टिळकांच्या भूमिकेत आहेत. ही वेब सीरिज तुम्ही ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.