औरंगाबाद: हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर धाय मोकलून रडण्याची वेळ आली आहे. औरंगाबादमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’ने या शेतकऱ्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी कॅमेऱ्यासमोर आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. चिखल आणि गाळात लोळून रडणाऱ्या शेतकऱ्यांचे हे विदारक चित्र डोळ्यात अश्रू उभे करणारे आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातही रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी रात्रभर तब्बल सहा फुटांनी वाढली. त्यामुळे सध्या पंचगंगा नदीने 17फुटांची पातळी गाठली आहे.
मुंबई - मुंबईत 14 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरपर्यंत पहाटे 2.30 पर्यंत कुलाबा वेधशाळेने 83 मिमी तर सांताक्रुझ वेधशाळेत 66 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उस्मानाबाद : जिल्ह्यात पावसांनंतर पुराचा हाहाकार समोर आला असून दोन पाझर तलाव फुटले आहेत. लोहारा तालुक्यातील मुरशदपूर येथील पाझर तलाव फुटल्याने पिकांचे नुकसान झाले.
पंढरपूर : गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या कोसळधार पावसामुळे नदी नाले दुधडी भरुन वाहत असून, शेतांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्यामुळे द्राक्ष, डाळिंब तसेच खरीप पिकांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.
पुणे : पुण्यात परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कात्रज , कोंढवा रस्त्यावर पावसाचे पाणी साचले.
रत्नागिरी : समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रत्नागिरीत रात्रीपासून पावसाच्या कोसळधारा पाहायला मिळत आहेत. किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम आहे.
सांगली : जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात 25 पूल पाण्याखाली गेले आहेत. तर तब्बल 18 रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे.
सातारा : जिल्हयात रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे माण, खटाव, फलटण, वाई, जावली, महाबळेश्वर तालुक्यांमध्ये नदी-नाले आणि तलाव भरुन वाहू लागले आहेत. कालपासून पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे. परिणामी सातारा येथील धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्यामुळे रात्रीपासून वीर, उरमोडी, कण्हेर, धोम धरणातून नदीपात्रात मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे.