
उत्तम आरोग्यासाठी पाणी हे फार महत्वाचे असते. पाणी हे फक्त शरीराला हायड्रेटेड ठेवत नाही तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासही मदत करते. पाण्यामुळे आपले अवयव व्यवस्थित काम करतात. तसेच यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा टिकून राहते.

जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर थकवा आणि सुस्ती निर्माण करते. तसेच पाणी हे त्वचेसाठी एखाद्या नैसर्गिक ग्लो सीरमसारखे काम करते. यामुळे त्वचेला ताजेपणा मिळतो. तसेच यामुळे तुमच्या चेहऱ्यावर वाढते वय दिसत नाही.

त्यासोबतच पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियमसारखी महत्त्वाची खनिजे असल्याने शरीराचे इलेक्ट्रोलाइट संतुलित राहते. साधारणपणे, एका व्यक्तीला दररोज 2.5 ते 3 लीटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण हवामान, वय आणि शारीरिक स्थितीनुसार हे प्रमाण बदलू शकते.

तहान लागणे हे शरीर डिहायड्रेटेड झाल्याचे लक्षण आहे. त्यामुळे तहान लागण्याआधीच पाणी पिणे ही एक उत्तम आरोग्य सवय असल्याचे बोलले जाते. सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्ट गीतिका चोप्रा यांनी वेगवेगळ्या वयोगटांसाठी आणि लिंगानुसार कोणाला किती पाण्याची आवश्यकता असते याबद्दल जाणून घेऊया.

सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्ट गीतिका चोप्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ते 3 वर्षांच्या मुलांनी दररोज 1.3 ते 1.5 लीटर पाणी प्यावे. तर 4 ते 8 वर्षांच्या मुलांसाठी 1.6 लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. त्यासोबतच 9 ते 13 वर्षांच्या मुलांनी 2 ते 2.2 लीटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

तसेच 14 ते 18 वर्षांच्या तरुणांनी 2.5 ते 3 लीटर पाणी प्यावे. प्रौढ पुरुषांनी दररोज 3 ते 3.7 लीटर पाणी प्यावे. तर प्रौढ महिलांनी म्हणजे 18 वर्षांवरील महिलांनी 2.5 ते 3 लीटर पाणी पिणे आवश्यक आहे.

गर्भवती महिलांनी त्यांच्या सामान्य प्रमाणाव्यतिरिक्त 0.3 ते 0.5 लीटर जास्त पाणी प्यावे. तर स्तनपान करणाऱ्या मातांनी 0.7 ते 1 लीटर अतिरिक्त पाणी प्यावे. कारण या दोन्ही स्थितींमध्ये शरीराला अधिक पाण्याची गरज असते.

60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी 2 ते 2.5 लीटर पाणी प्यावे. पण कोणीही पाण्याचा अतिरेक करु नये. तसेच शरीरात पाण्याची कमतरता असणेही हानिकारक मानले जाते. त्यामुळे आपल्या शरीराच्या गरजा समजून योग्य प्रमाणात पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

न्यूट्रिशनिस्ट गीतिका चोप्रा यांच्या मते, जर तुम्हाला जास्त उष्णता जाणवत असेल, व्यायाम करत असाल किंवा जास्त शारीरिक हालचालींचे काम करत असाल तर तुम्हाला अधिक पाण्याची गरज असते.

याशिवाय, ताप किंवा डिहायड्रेशन झाल्यास केवळ पाणीच नाही तर इतर आरोग्यदायी पेये देखील घेणे महत्त्वाचे आहे. थोडक्यात, पाणी हे आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे आपल्या शरीराच्या गरजा ओळखून योग्य प्रमाणात पाणी प्या आणि निरोगी राहा.