Monsoon Update : मान्सूनची सरकारी तारीख आली, CMO कार्यालयानेच थेट सांगितलं, त्या सूचनेनं मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली!
सध्याच्या परिस्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे, अशीही महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

राज्यात 1 जूनपासून काही भागांत वादळी पावसाची शक्यता असली, तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळ येथे पोहोचलेला नाही, असे मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे.

तसेच, सध्याच्या परिस्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे, अशीही महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश तसेच कोकणातील काही भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले.

तसेच, पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम राहू शकतो. शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे, असेही या कार्यालयाने सांगितले.

विजांच्या कडकडाटाच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी. झाडाखाली, टिनशेडखाली, वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळा. स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.