
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारताला प्रचंड फटका बसतो आहे. भारतात कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. सोबतच भारतात नैसर्गिक वायूचाही मोठा तुटवडा निर्माण झाला असून अनेक घरगुती गॅस सिलिंडरचा भाव वाढला आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचाही भाव वाढल्याने हॉटेल्स, खानावळी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. उद्योग क्षेत्रालाही याचा फटका बसत आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने कच्चे तेल तसेच नैसर्गिक वायूची जहाजे भारतात येत नाहीयेत.

सध्याचा इंधन तुटवडा आणि भारतावर निर्माण झालेले उर्जासंकट लक्षात घेता युद्ध सुरूच राहिले तर परिस्थिती फारच बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पर्शियन आखातात भारताची 22 मोठी जहाजे अडकून पडलेली आहेत. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यास परवानगी दिल्यास ही सर्व 22 जहाजे भारतात इंधन घेऊन येऊ शकतात.

ही सर्व जहाजे भारतात आली तर भारतातील उर्जासंकट कमी होऊ शकते. भारताला मोठा दिलासा मिळू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार या सर्व जहाजांमध्ये 1.67 दशलक्ष टन क्रूड ऑईल आहे. तसेच या जहाजांमध्ये 3.2 लाख टन एलपीजी, 2 लाख टन एलनएनजीही आहे. सध्याची इंधन टंचाईची स्थिती पाहता भारताचा हा इंधनरूपी मोठा खजानाच पर्शियनच्या आखातात अडकून पडला आहे.

त्यामुळेच ही जहाजे पर्शियन आखातातून आले तर भारताचे उर्जासंकट संपू शकते, असे म्हटले जात आहे. अगोदर स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये एकूण 28 भारतीय जहाजे होती. यातील 24 जहाजे हे पश्चिमेस तर 4 जहाजे ही पूर्वेस होती. गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूची दोन-दोन जहाजे भारतात दाखल झाली आहेत. त्यामुळे बाकीची जहाजे नेमकी कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.