Team India T20 World Cup Squad : शुबमन गिल सारख्या मोठ्या प्लेयरला वर्ल्ड कप टीममधून का ड्रॉप केलं? अजित आगरकरांकडून खुलासा
Team India T20 World Cup Squad : फेब्रुवारी महिन्यात मायदेशात टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने वर्ल्ड कप साठी टीम निवडताना एक मोठा निर्णय घेतला. तसं पहायला गेलं, तर हा एक मोठा संदेश आहे.

निवड समितीने थेट शुबमन गिलला टीममधून ड्रॉप करण्याचा निर्णय घेतला. शुबमन गिल हा भारताच्या वनडे आणि टेस्ट टीमचा कॅप्टन आहे. इतक्या मोठ्या प्लेयरला वर्ल्ड कपच्या टीममधून वगळणं हा सोपा निर्णय नाही. पण निवड समितीने हा निर्णय घेतला.

शुबमन गिल हा टीम इंडियाच्या टी 20 संघाचा उपकर्णधार होता. आता त्याच्याजागी अक्षर पटेलला उपकर्णधारपदी बढती मिळाली आहे. अनेक महिने संघाबाहेर असलेल्या इशान किशनसाठी टीमचे दरवाजे उघडले आहेत. इशानने देशांतर्गत क्रिकेट टुर्नामेंटमध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत.

शुबमन गिलचा टी 20 मध्ये धावांसाठी संघर्ष सुरु होता. भारताच्या टेस्ट आणि वनडे टीमचा कॅप्टन असल्याने गिलसाठी संजू सॅमसनला बाहेर बसवण्यात येत होतं. पण गिलला दुखापत झाल्याने संजूला संधी मिळाली. काल संजूने दमदार फलंदाजीतून त्याची निवड सार्थ ठरवली.

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी शुबमनची निवड का केली नाही? ते कारण सांगितलं. तो फॉर्ममध्ये नव्हता, त्याने पुरेशा धावा केल्या नव्हत्या त्यामुळे त्याला वगळल्याचं अजित आगरकर म्हणाले.

आशिया कपच्या स्क्वाडचा भाग असलेल्या रिंकू सिंहने टीममध्ये पुनरागमन केलं. फिनिशर म्हणून त्याचा टीममध्ये समावेश झाला आहे. जितेश शर्माची जागा तो घेईल. रिंकू सिंह, इशान किशन यांची निवड थोडी आश्चर्यकारक वाटली.