
इराण-इस्रायल युद्धाचा भारताला फटका बसत आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली असल्याने भारतात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. एलपीजीचा तुटवडाही निर्माण झाला आहे.

असे असतानाच आता इराणने भारताकडे मोठी मागणी केली आहे. भारताने इराणची तीन जहाजे जप्त केलेली आहेत. या तिन्ही तेल टँकरचे नाव अस्फाल्ट स्टार, अल जाफजिया आणि स्टेलर रूबी असे आहे.

या तिन्ही जहाजांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने भारताने ही जहाजे जप्त केलेली आहेत. भारताने ही तिन्ही जहाजे सोडून द्यावीत तसेच भारताने इराणला काही औषधं द्यावीत, अशी मागणी इराणने केली आहे.

भारताने ही मागणी मान्य केली तर आम्ही भारतीय तेलवाहू जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाऊ दे, असा प्रस्ताव इराणने भारतापुढे ठेवला आहे. दरम्यान, आता या प्रस्तावावर नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्या इराण आणि भारत यांच्यात चर्चा सुरू आहे. नवी दिल्लीत इराणच्या राजदूतांनी भारतीय परराष्ट्रमंत्र्यांची सोमवारी भेट घेतली. या बैठकीत याच मागणीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.