
शब्दांचा वापर जपून करणे हा आपल्या पूर्वजांनी दिलेला महत्त्वाचा मंत्र आहे. मौन हे अनेकदा महत्त्वाचं ठरतं. एखादा चुकीचा शब्द निघाला तर नात्यात, मैत्रित दुरावा येतो आणि मग मनाला पडलेले घाव कित्येक वर्ष तसेच राहतात. ते प्रेमळ शब्दांनीच दूर होतात.

जेव्हा तुम्ही रागात असतात तेव्हा वाणीवर आणि शब्दावर ताबा ठेवा. कारण रागात आपण केव्हा काय बोलता आणि काय बोलून बसतो याचा पश्चाताप पुढे अनेक दिवसांनी आपल्याला होतो. त्यामुळे राग आला असेल तर शांत होण्याचा प्रयत्न करा, नाहक बडबड करू नका.

जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी अथवा घटनेविषयी तुम्हाला काही माहिती नसते तेव्हा वायफळ बडबड करू नका. तुमच्या अज्ञानाचे प्रदर्शन होईल. ज्या गोष्टीची माहिती अथवा ज्ञान नाही अशावेळी शांत राहणे, मौन राहणे अथवा आपल्याला त्याची माहिती नाही असे सांगणे सर्वात चांगले आहे

तुमच्या पाठीमागे नाहक तुमची बदनामी होत असेल. तुमची निंदा नालस्ती करण्यात येत असेल तर कुणावरही रागाराग करू नका. संपूर्ण माहिती घ्या. कोण कोणत्या कारणावरून तुम्हाला वाईट म्हणतंय. त्यामागील उद्देश समजून घ्या. नंतरच अशा प्रकरणात बोलणे श्रेयस्कर ठरेल.

गैरसमज होत असेल. कुणाचा अपमान होत असेल तर तोंड बंद ठेवणेच फायद्याचे आहे. कारण त्यामुळे इतरांविषयी तुम्ही नकारात्मक गोष्टी तर वाढवताच. पण सोबतच तुमची वृत्ती, तुमचे व्यक्तिमत्व पण नकारात्मक होते. अशावेळी बडबड करू नका.

जर कोणी विश्वासाने तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली असेल. तर ती गोष्ट तुम्ही इतरांना अजिबात सांगू नका. तुमच्या नाहक बडबडीमुळे कुणाचे तरी सीक्रेट उघड होण्याची शक्यता आहे. तर त्याच्या तुमच्यावरील विश्वासालाही तडे जाऊ शकतात.