
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुरळा सध्या पाहायला मिळत आहे. या सर्व महापालिकांसाठी येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांत सत्ता मिळवण्यासाठी महायुती, महाविकास आघाडी आणि राज ठाकरेंची मनसे यांनी आपली कंबर कसली आहे. त्यातच आता जागावाटपाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनपेक्षित युती, तर काही ठिकाणी स्वबळाचा नारा पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात कोण, किती आणि कोणत्या जागांवर निवडणूक लढवणार याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

मुंबईत सत्तेचे समीकरण बदलण्याची शक्यता असून महायुतीने आपले जागावाटप पूर्ण केले आहे. महायुतीत भाजप १३७ जागांवर, तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ९० जागांवर निवडणूक लढवत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मुंबईत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ६० ते ७० जागांवर उमेदवारी अर्ज भरला आहे.

तसेच ठाकरे-मनसे युती झाली असून उद्धव ठाकरे गट १६४ जागांवर निवडणूक लढत आहेत. तर राज ठाकरेंची मनसे ५३ जागांवर निवडणूक लढवताना दिसत आहेत. मुंबईत काँग्रेस आणि वंचितने आघाडी केली आहे. काँग्रेसने १३९ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर वंचित बहुजन आघाडी ६२ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.

पुणे जिल्ह्यात अजित पवार आणि शरद पवार यांची युती झाली आहे. त्यामुळे भाजपने सर्व १६५ जागांवर स्वबळावर लढण्याचा पवित्रा घेतला आहे. अजित पवार गट १२२ जागांवर निवडणूक लढवत आहे. तर शरद पवार गटाने ४० जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने सर्व १२८ जागांवर लढण्याचा निर्धार केला आहे. अजित पवार गट १०० जागांवर ताकद लावत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिवसेना ८७ आणि भाजप ४० जागांवर एकत्र लढण्याचे संकेत आहेत. काँग्रेसने येथे १०० जागांवर स्वबळाची तयारी दर्शवली आहे.

भाजपने नाशिकमध्येही सर्व १२२ जागांवर स्वबळाचा नारा दिला आहे. येथे उद्धव ठाकरे गट (६०) आणि मनसे (२०) यांच्यात युतीसाठी चर्चा सुरू आहे. अहिल्यानगरमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आपली रणनीती स्पष्ट केली आहे.

अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडल्याचे चित्र असून शिंदे गट स्वतंत्र लढणार आहे. या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्रितपणे रिंगणात उतरले आहेत. तर शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांनी एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे या ठिकाणी शिवसेना शिंदे गट सर्वाधिक ५४ जागांवर, तर राष्ट्रवादी अजित पवार गट ३४ आणि भाजप ३२ जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तसेच उल्हासनगरमध्ये भाजपने ७८ जागांवर स्वबळाचा नारा दिला आहे. येथे शिवसेना ३५ आणि टीम ओमी कलानी ३२ जागांवर दावा करत आहेत.