
आपल्याला अनेकदा बाहेर फिरायला, भटकायला प्रचंड आवडतं. मुंबईतील गजबजाटापासून दूर, शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी सुट्ट्या घालवायला अनेकांना आवडतं. पण नेमकं कुठे जायचं हे ऐनवेळी सुचत नाही.

जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर तुमच्या आजूबाजूला अनेक मनमोहक हिल स्टेशन्स आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला अगदी सहज पोहोचता येते. विशेष म्हणजे या ठिकाणी असलेले नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणामुळे तुमचे मन देखील शांत होतं.

मुंबईजवळ असलेल्या या हिल स्टेशन्सवर तुम्हाला ट्रेकिंग आणि विविध ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेता येतो. तसेच जर तुम्हाला फोटोग्राफी करण्याची हौस असेल तर तुमच्यासाठी ही ठिकाणे एकदम बेस्ट आहेत.

महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यात असलेले कर्जत शहर मुंबईपासून सुमारे ६५ किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी शांत वातावरण, सुंदर डोंगररांगा पाहून तुमचे मन प्रसन्न होते. या ठिकाणी तुम्हाला ट्रेकिंग, रॅपलिंग, रिव्हर राफ्टिंग आणि व्हॅली क्रॉसिंग यांसारख्या अनेक साहसी ॲक्टिव्हिटी करता येतात.

कर्जतमध्ये तुम्ही उल्हास व्हॅली, भोर घाट, कोंडाणा गुंफा, पेठ किल्ला यांसारख्या अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता. मुंबईहून कर्जतला पोहण्यासाठी फक्त १ ते २ तास लागतात.

मुंबईच्या सर्वात जवळच्या हिल स्टेशन्समध्ये माथेरानचा समावेश होतो. या ठिकाणी ३३ व्ह्यू पॉईंट्स आहेत. यात पॅनोरामा पॉईंट, सनसेट पॉईंट, लुईसा पॉईंट, हार्ट पॉईंट हे पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत. याठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला साधारण २ ते ३ तास लागतात.

माळशेज घाट हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे, जे मुंबईपासून सुमारे १२७ किलोमीटर दूर आहे. माळशेजमध्ये असलेला धबधबा हे येथील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. माळशेजचा संपूर्ण परिसर पावसाळ्यात फारच विलोभनीय दिसतो. याठिकाणी असलेला कोकण कडा, पिंपळगाव जोगा धरण आणि हरिश्चंद्र किल्ला यांसारख्या अनेक सुंदर जागांना तुम्ही भेट देऊ शकता.

आंबोली हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले एक गाव आहे. हे ठिकाण धबधबे आणि हिरव्यागार डोंगरांसाठी ओळखले जाते. येथील हवामान फारच सुखद असते. जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल, तर तुम्ही नक्कीच येथे भेट देऊ शकता. आंबोलीत तुम्हाला गावकर धबधबा, माधवगड किल्ला, महादेव गड, सनसेट पॉईंट यांसारख्या जागांना भेट देता येईल.