
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच पुरामुळे खराब झालेल्या रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामं तातडीनं करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मुसळधार पावसामुळे पुरंदर तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाळुंज येथे जाऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील पिकांची पाहणी केली. त्यांनी खानापूर, आटपाडी तालुक्यातील गावांना भेटी देत शेतकरी बांधावांना दिलासा दिला.

अवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. भाजप खासदार प्रीतम गोपीनाथ मुंडे यांनी पाटोदा तालुक्यातील सौताडा भागात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी आणि बाधित कुटुंब वंचित राहणार नाही याचीही दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील केशेगाव येथे रणजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी केशेगाव येथील फुटलेल्या मेसाई तलावाला भेट देऊन कार्यवाहीसाठी सूचना दिल्या.

शिवसेना खासदार ओम राजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. तसेच त्यांनी तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.