
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा थेट परिणाम आता जम्मू-कश्मीरच्या पर्यटन उद्योगावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पर्यटकांनी गजबजलेल्या रस्त्यांवर आता पूर्णपणे शुकशुकाट पसरला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील बहुतांश रस्त्यावर सर्वत्र सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत. तसेच या ठिकाणची संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. यामुळे या ठिकाणी लॉकडाऊनप्रमाणे दृश्य दिसत आहे.

पहलगाम आणि आसपासच्या भागातील मंदिरे आणि मशिदीसुद्धा पर्यटकांविना ओस पडले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे जम्मू-काश्मीरच्या पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

जम्मू काश्मीरच्या पर्यटन व्यवसायातून 2030 पर्यंत 30 हजार कोटी रुपयांची उलाढाल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र आता हे शून्यावर पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक लोकांच्या मते, हा हल्ला केवळ पर्यटकांवर नसून काश्मीरवर आहे. जम्मू-कश्मीरच्या एकूण अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्राचा वाटा आठ टक्के आहे. 2024-25 मध्ये राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) सात टक्क्यांची वाढ झाली आहे, यातील सर्वाधिक वाढ ही पर्यटन क्षेत्राची आहे.

काही ट्रॅव्हल एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरसाठी करण्यात आलेल्या 90 टक्के बुकिंग रद्द करण्यात आल्या आहेत.

तर नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेत 20 विमानांमधून 3,337 प्रवाशांनी श्रीनगरवरुन परतीची उड्डाणे घेतली.

इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाइसजेट या विमान कंपन्यांनी श्रीनगरमधून त्यांच्या नियमित वेळापत्रकानुसारच्या सेवांव्यतिरिक्त एकूण सात अतिरिक्त विमानांची व्यवस्था केली. पहलगामसह जम्मू-कश्मीरमधील अनेक ठिकाणांहून पर्यटक आता त्यांच्या घरी परतत आहेत.

काही टूर ऑपरेटर्सने दिलेल्या माहितीनुसार, अनेक पर्यटकांनी वैष्णोदेवीसाठीच्या बुकिंग्सही रद्द केल्या आहेत. या हल्ल्यामुळे जम्मू-कश्मीरच्या पर्यटन उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. जर ही परिस्थिती कायम राहिली तर राज्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे दूरगामी आणि नकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.