
झी मराठी वाहिनीवर ‘सनई चौघडे’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि आठवड्याभरातच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेची कथा लालबागमध्ये राहणाऱ्या परब कुटुंबाची आहे, ज्यांची स्वामींवर अत्यंत श्रद्धा आणि भक्ती आहे.

याचंच औचित्य साधत परब कुटुंब मुंबईहून थेट त्र्यंबकेश्वर इथल्या ‘श्री स्वामी समर्थ गुरुपीठात’ विश्वविक्रमी श्री स्वामी समर्थ तारकमंत्र पठणासाठी पोहोचले. या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कलाकारांनी येणाऱ्या भागात मालिकेत घडणाऱ्या घडामोडींबद्दल माहिती दिली आणि आपले स्वामीं बद्दलचे अनुभव सांगितले.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर आणि परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपाआशीर्वादाने जवळप्पास 7000 हून अधिक भक्तांसोबत परब कुटुंबाने श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचं सामूहिक पठण करत ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’ला गवसणी घातली आणि स्वामींचं आशीर्वाद घेतलं.

ही मालिकेतील सर्व कलाकारांसाठी अभिमानाची गोष्ट होती. या भव्य उपक्रमात परब कुटुंबातील पमा, सुभाष आणि त्यांच्या चारही मुलींनी म्हणजेच मेघना एरंडे जोशी, सुहास शिरसाट, चिन्मयी साळवी, श्वेता गायकवाड, जुई गोगरी, रुची नेरुरकर या कलाकारांनी सहभाग घेतला होता.

मेघना एरंडे जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, "आजचा अनुभव माझ्यासाठी केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर एक अतिशय आध्यात्मिक आणि अंतर्मुख करणारा प्रवास होता. 7 हजारहून अधिक भक्त एकाच सुरात स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करताना पाहणं त्यात सहभागी होणं, हे शब्दांत मांडणं खरंच कठीण आहे."