63 वर्षीय ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री आजही अविवाहित; 25 वर्षांपासून सिक्रेट रिलेशनशिप
'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्वाती आनंद नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्न न करण्याच्या तिच्या निर्णयाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे. लग्नावरून जेव्हा नातेवाईक टोमणे मारतात, तेव्हा काय प्रतिक्रिया देते, याचाही खुलासा तिने केला आहे.

'पवित्र रिश्ता' आणि 'कुमकुम भाग्य' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री स्वाती आनंद आता 63 वर्षांची झाली आहे. मात्र अद्याप तिने लग्न केलं नाही. स्वाती आनंदने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 25 वर्षांपासून ती एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, मात्र या नात्याबद्दल सोशल मीडियावर काहीच शेअर न करण्याचा तिने निर्णय घेतला आहे.

कधीच लग्न न करण्याचा आणि कोणत्याच व्यक्तीसोबत एका नात्याच्या बंधनात अडकणार नसण्याचं तिने स्पष्ट केलं. 'टेली मसाला'ला दिलेल्या मुलाखतीत स्वाती आनंद याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे. ती म्हणाली, "मला कधीच असं वाटलं नाही की मी लग्न करावं. मी लहानपणीसुद्धा हेच म्हणायची की मी एकटीच राहीन. माझ्या आईला खूप वाईट वाटायचं. माझी एकुलती एक मुलगी आहे, तिचं लग्न मी धूमधडाक्यात करेन, असं ती म्हणायची."

"हळूहळू जेव्हा मी मोठी होत गेली, तेव्हा माझे विचार लोकांना कळू लागले. आपल्या भारतात, समाजात कसेही विचार असले तरी माझ्या घरात मला खूप स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे मला नेहमीच हे वाटत होतं की, मी जिथे कुठे जाईन, तिथे मला इतकं स्वातंत्र्य मिळणार नाही", असं तिने पुढे सांगितलं.

"माझ्या मनात त्याबद्दलचा प्रश्न कायम राहिला. तसंच मी खूप भावूक आहे. मला असं वाटतं की जर मी एखाद्याला 100 टक्के देत असेन, तर समोरच्या व्यक्तीने किमान 50 टक्के तरी त्याबदल्यात द्यावेत. आपण कोणाशीच अपेक्षा ठेवायची नाही, असं तर कधी होत नाही. कारण आपण सर्वजण शेवटी माणूस आहोत. वेळेसोबत नात्यात दुरावासुद्धा येतो, कारण आपल्या आसपास बऱ्याच सवलती आहेत", असं मत स्वातीने मांडलं.

स्वातीने या मुलाखतीत सांगितली की, तिला जे प्रेम तिच्या घरात लहानपणापासून मिळालं, ते जर लग्नानंतर मिळालं नाही तर काय होईल, हा प्रश्न तिला कायम सतावत राहिला. म्हणूनच तिने आजवर लग्न केलं नाही. अनेकदा लग्नावरून नातेवाईक जे टोमणे मारतात, त्याविषयीही ती मोकळेपणे व्यक्त झाली.

"मला कधीच कोणाशी समस्या नव्हती. मी सर्वांना मॅनेज करण्यात खूप कम्फर्टेबल आहे. माझे पालक मला इतकं समजून घेतात की त्यांनी लग्नासाठी कधीच माझ्यावर दबाव आणला नाही. त्यांना माझ्या या निर्णयाचा कधी पश्चात्तापही जाणवला नाही. ते असेच खुश आहेत", असं ती म्हणाली.