
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता 29 आणि 30 डिसेंबर असे दोनच दिवस शिल्लक आहेत. मुंबई महापालिकेचे सर्वाधिक 227 प्रभाग आहेत. तर उमेदवारीच्या मागणीसाठी इच्छुक उमेदवारांकडून मातोश्रीबाहेर आंदोलन करण्यात आलं.

आम्हाला न्याय द्या, अशी मागणी नाराज उमेदवार उद्धव ठाकरेंकडे करत आहेत. 'मातोश्री'बाहेर उमेदवार हातात फोटो घेऊन ठिय्या मांडून बसल्याचं पहायला मिळालं. यावेळी त्यांनी हात जोडले आणि भावूक होत उद्धव ठाकरेंकडे उमेदवारीची मागणी केली.

"2017 मध्ये ओबीसी वॉर्डमध्ये दुसऱ्यांना तिकिट दिलं. आम्हाला पण तिकिट दिली होती, परंतु त्या निवडणुकीत आमचा पराभव झाला होता. आता त्यांनी आम्हाला तिकिट द्यावी, अशी आमची मागणी आहे," असं उमेदवार म्हणाले.

"186 वॉर्डमध्ये माझ्या वडिलांचं काम खूप चांगलं आहे. लोकांचे प्रश्न आम्ही सोडवू शकतो. लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि ते आम्हाला निवडून देतील, असा आम्हालाही विश्वास आहे," असं म्हणत उमेदवारीची मागणी केली.

मोठमोठ्या राजकीय पक्षांची प्रतिष्ठा या निवडणुकीसाठी पणाला लागली आहे. शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारांना पक्षांनी एबी फॉर्मचं वाटप केल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याचीही शक्यता आहे.

मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या सेनेकडून 40 जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मातोश्रीबाहेर एबी फॉर्म घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे.