
आगामी महापालिका निवडणुकीत राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरु आहे. अशातच आज हे दोन्ही नेते एका कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. त्यानंतर हे दोघे मातोश्रीवर पोहोचले.

या दोन्ही नेत्यांमध्ये मातोश्रीवर बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल अर्धा तासाच्या चर्चेनंतर राज ठाकरे हे मातोश्रीवरून बाहेर पडल्याचे दिसून आले.

या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती समजू शकलेली नाही. मात्र आगामी पालिका निवडणुकीतील युतीबाबत चर्चा झाली असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.

राज ठाकरे मातोश्रीवरून बाहेर पडताना रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे त्यांना निरोप देण्यासाठी बाहेर आले होते. यावेळी राज-उद्धव ठाकरेंनी हस्तांदोलन करत निरोप घेतला.

तत्पूर्वी, हे दोन्ही नेते संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्यात एकत्र दिसले होते. या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाल्याचे दिसून आले होते.