
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष , किसान सभा आणि कामगार संघटनांच्या लॉंगमार्चचा आजचा दुसरा दिवस आहे. काल राजूर गावातून निघालेल्या लॉंगमार्चमध्ये आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, अंगणवाडी सेविका, मदतनीस , आशा सेविका यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलक अहिल्यानगरकडे पायी निघाले , त्यांनी रात्री अकोले येथे मुक्काम केला.

आज पुन्हा दुस-या दिवशी अकोलेतून हा मार्च संगमनेरकडे मार्गक्रमण करतोय. कालच राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलकांना चर्चेचे निमंत्रण पाठवले असून आंदोलकांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात तोडगा काढण्यासाठी आज दुपारी चार वाजता मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पाच मंत्री आणि विविध विभागाचे मुख्य सचिव उपस्थित राहणार आहेत. एकीकडे चर्चेसाठी शिष्टमंडळ जाणार असलं तरीही दुसरीकडे मोर्चा देखील मार्गक्रमण करत राहणार आहे. या बैठकीत काही तोडगा निघतोय का.? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वनाधिकार कायद्याची न्याय अंमलबजावणी करा, फॉरेस्ट जमिनीवर बांधलेले घरे व तळ जमिनी राहणाऱ्यांच्या नावावर करा. गायरान जमिनी कसून आपल्या उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीची मालकी द्या. आदिवासींचे महत्त्वाचे नगदी पीक असलेल्या बाळ हिरड्याची सरकारी खरेदी पुन्हा सुरू करा अशा काही आंदोलकांच्या मागण्या आहेत.

तसेच वन्य प्राण्यांच्या त्रासापासून शेतकऱ्यांना संरक्षण द्या. अर्धवेळ परिचारकांना कामाचा रास्त मोबदला मिळावा , त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून सेवेत कायम करावे. नोंदणीकृत बांधकाम कामगाराची पत्नी, सर्व मुले, आई-वडील यांना मेडिक्लेम योजनेचा लाभ द्यावा. बांधकाम कामगारांच्या पाल्यांना पूर्वीप्रमाणे शिष्यवृत्ती द्यावी अशाही मागण्या त्यांनी केल्या आहेत.

आशा सुपरवायझर व आशा कर्मचाऱ्यांचे वेतन, मानधन कामाचा मोबदला, भत्ते ही देयके दर महिन्याच्या पाच तारखेच्या आत द्यावे. आशा कर्मचाऱ्यांना किमान 26000 व सुपरवायझर यांना किमान 35 हजार रुपये वेतन द्यावे. शालेय पोषण आहार कामगारांना किमान 18 हजार रुपये वेतन द्या .सर्व अंगणवाडी सेविकांना किमान 30 हजार रुपये वेतन द्या. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले मार्गे मंजूर करा याही त्यांच्या मागण्या आहेत.