
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री येतात आणि जातात, मात्र काही कलाकार कमी काम करूनही प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतात. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे गायत्री जोशी. अतिशय कमी कालावधीसाठी इंडस्ट्रीत काम करूनही तिने आपली वेगळी छाप पाडली.

गायत्री जोशी हिंदी सिनेमातील अत्यंत सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. विशेष म्हणजे, तिने केवळ एका चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली आणि त्यानंतर इंडस्ट्रीला अलविदा केले. तिचा एकमेव चित्रपट म्हणजे 'स्वदेश'. ज्यामध्ये तिने शाहरुख खानसोबत काम केलं आहे.

2004 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तिच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. ‘स्वदेश’ हा चित्रपट आजही शाहरुख खानच्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो आणि त्यात गायत्री जोशीची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली.

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी गायत्री जोशीने मॉडेलिंग क्षेत्रात मोठे यश मिळवले होते. ती 1999 च्या Femina Miss India स्पर्धेतील फायनलिस्ट होती. तसेच 2000 साली Miss International 2000 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. अभिनयापूर्वी तिने अनेक नामांकित ब्रँड्सच्या जाहिरातींमध्येही काम केले होते.

मात्र, ‘स्वदेस’नंतर तिने अचानक चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. 2005 साली तिने उद्योगपती विकास ओबेरॉय यांच्याशी विवाह केला आणि त्यानंतर त्या पूर्णपणे वैयक्तिक आयुष्यात रमल्या.

सध्या गायत्री जोशी आपल्या पती आणि दोन मुलांसोबत मुंबईत आलिशान जीवन जगत आहेत. विकास ओबेरॉय यांनी रिअल इस्टेट आणि इतर व्यवसायांत मोठे यश मिळवले असून त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे 45,000 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.