40 व्या वर्षीच मेनोपॉज, मंत्रोच्चाराने परत आली मासिक पाळी; अभिनेत्रीचा चकीत करणारा दावा
वयाच्या 40 व्या वर्षी पाळी येणं बंद झाल्यानंतर या अभिनेत्रीने विविध चाचण्या केल्या. त्यात तिला रजोनिवृत्ती आल्याचं कळलं. मात्र काही उपचार आणि मंत्रोच्चाराच्या जोरावर तिने सकारात्मक बदल घडवून आणला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री श्वेताने याविषयी सांगितलं आहे.

'कहानी घर घर की', 'कुसुम' आणि 'बालवीर' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता क्वात्रा आता 50 वर्षांची झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून ती अभिनयक्षेत्रापासून दूर असून दुबईत वास्तव्याला आहे. दुबईत श्वेता बौद्ध धर्माच्या शिकवणींचं अनुसरण करत आहे.

श्वेताने सांगितलं की, यामुळे तिला केवळ मानसिक शांतीच नाही तर आरोग्याचेही अनेक फायदे मिळाले आहेत. 'शायनी नारंग'ला दिलेल्या मुलाखतीत ती तिच्या खासगी आयुष्याविषयी मनमोकळेपणे व्यक्त झाली आहे. या मुलाखतीत तिने 'नाम म्योहो रेंगे क्यो' या मंत्रजापचं महत्त्वही सांगितलं आहे.

"मी वयाच्या 36 व्या वर्षी आई झाली आणि जेव्हा मी 40 वर्षांची झाले, तेव्हा डॉक्टरांनी मला काही चाचण्या करायला सांगितल्या होत्या. त्यात समजलं की मला रजोनिवृत्ती (Menopause) आली आहे. मला दोन ते तीन महिन्यांपूर्वी पाळी होती, अशी माहिती जेव्हा डॉक्टरांना मी दिली, तेव्हा चाचण्यांनंतर त्यांनी मला सांगितलं की, आता तुम्हाला पाळी येणार नाही. हे ऐकून मला धक्काच बसला", असं तिने सांगितलं.

श्वेता पुढे म्हणाली, "तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या शरीरात होणारे बदल मला आधीपासूनच रजोनिवृत्तीचे संकेत देत होते. पण मला ते समजत नव्हतं. चाळीशी हे रजोनिवृत्तीचं वय नाही. तेव्हा मी ठरवलं की मी हार मानणार नाही. मी हे सर्व बदलण्याचा निश्चय केला होता. मी माझ्या आयुष्याचा ताबा पुन्हा मिळवण्याचं ठरवलं होतं. तेव्हा एका व्यक्तीने मला अॅक्युपंक्चर करून घेण्याचा सल्ला दिला. त्या काळात मी मंत्रोच्चारसुद्धा करत होती."

श्वेताने या मुलाखतीत सांगितलं की, त्या कठीण काळात तिने तीन डॉक्टरांना भेटून सल्ला घेतला होता. त्या सर्वांनी सांगितलं होतं की तिला रजोनिवृत्ती आली आहे. काहींनी तिला तिच्या किडनीवरही उपचार करण्याचा सल्ला दिला होता, तर काहींनी तिच्या स्वादुपिंडाबद्दल तक्रारी सांगितल्या होत्या. मात्र श्वेताने हार मानली नाही. तिने उपचारांसोबत मंत्रोच्चार करणंही सुरू ठेवलं होतं.

पाच वर्षे उपचारानंतर आणि मंत्रोच्चारानंतर मासिक पाळी परत आल्याचा खुलासा श्वेताने केला. "आशा आणि विश्वासाच्या जोरावर तुम्ही कठीणातली कठीण लढाईसुद्धा जिंकू शकता. मी असं म्हणत नाही की हे नेहमीच यशस्वी होईल, पण काहींच्या बाबतीत ते नक्कीच यशस्वी होतं. मग प्रयत्न करत राहण्यात काय हरकत आहे", असं मत तिने मांडलं.