Rahul Deshpande : हा अध्याय संपला… राहुल देशपांडे घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच व्यक्त
विख्यात गायक राहुल देशपांडे यांनी नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयाबद्दल मोकळेपणाने सांगितले. पत्नी नेहासोबतच्या 17 वर्षांच्या संसारानंतर, घटस्फोट जाहीर करण्यामागची भूमिका, त्यामागचा हेतू आणि ट्रोलिंगला सामोरे जाण्याचा अनुभव त्यांनी मांडला.

विख्यात गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाचे, आवाजाचे लाखो चाहते आहेत. आपल्या गाण्याने त्यांनी प्रेक्षकांच्या, रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलं असून दिग्गज गायक वसंतराव देशपांडे यांचा नातू म्हणून नव्हे तर राहुल यांनीने स्व:तची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावरही राहुल देशपांडेखूप ॲक्टिव्ह असतात. त्यांची गाणी, प्रयोग, चित्रपट, आगामी प्रोजेक्ट याबद्दल ते चाहत्यांशी शेअर करत असतात. (photos : Social Media/ Instagram)

असं असलं तरी वैयक्तिक आयुष्य आणि प्रोफेशन आयुष्य त्यांनी वेगळं ठेवलंय. मात्र काही महिन्यांपूर्वी राहुल यांनी केलेल्या एका घोषणेने अनेकांना मोठा धक्का बसला. 17 वर्षांच्या संसारानंतर राहुल व त्यांची पत्नी नेहा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला, ज्याबद्दल राहुल देशपांडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट लिहीली होती. त्यानंतर अनेक महिन्यांनी एक पॉडकास्टमध्ये राहुल देशपांडे हे वैयक्तिक आयुष्यातील या निर्णयाबद्दल आणि सोशल मीडियावर ही पोस्ट का केली याबद्दलही मोकळेपणाने बोलले

'मित्र म्हणे' या पॉडकास्टमध्ये आलेल्या राहुल यांनी त्यांचं गायन, गायनाचा प्रवास, त्यातील अनुभव तर सांगितलेच पण वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारल्यावर त्यावरही ते शांतपणे व्यक्त झाले. घटस्फोट, ते जाहीर करणं, सोशल मीडियावर सांगणं, त्यानंतर झालेलं ट्रोलिंग याबद्दल ते थेट, स्पष्ट शब्दांत बोलले. ' एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून मी अतिशय प्रामाणिक आहे. रेणुका, मी, नेहा, आमच्या खूप पोस्ट दिसतील आणि मला असं वाटलं की, ही माझी एक जबाबदारी आहे. जे मला फॉलो करणारी लोक असतील, समाजात जे माझे चाहते असतील, " हा अध्याय संपलाय", हे त्यांना सांगणं एवढंच त्या पोस्टचा हेतू होता' असं राहुल यांनी नमूद केलं.

' कारण इतरवेळी आम्ही कुठे बाहेर गेलो तर, आमचे तिथले काही फोटो असायचे. मी इकडे गेलो, तिकडे फिरलो, असं खूप प्रदर्शन मांडलं नाहीये, पण जेवढ्यास तेवढे असे फोटो, पोस्ट्स असायच्या. आणि त्या पोस्ट अजूनही आहेत. त्यामुळे मला असं वाटलं की, हा अध्याय आता संपलाय हेसुद्धा लोकांना सांगायला पाहिजे. बाकी इतर काहीही हेतू नव्हता' असंही राहुल यांनी सांगितलं.

'आमचे संबंध आजही खूप चांगले आहेत. आम्ही रेणुकाचे आई-वडील आहोत आणि ते कायम राहू.' असंही राहुल याने पुढे बोलताना सांगितलं. ' मी रेणुकाची एक पोस्ट टाकली होती, त्यात नेहा होती. नेहाने पण एक पोस्ट टाकली होती" असं ते यावेळी म्हणाले.

घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर राहुल यांना बऱ्याच ट्रोलिंगलाही सामोर जावं लागलं, त्याबद्दलही ते बोलले. "माझं आयुष्यात ट्रोलिंग खूप झालं आहे. मी त्या पोस्टनंतर मी एकही फोन घेतला नाही. कारण हा माझा वैयक्तिक विषय आहे. मी कसा बरोबर, माझ्यावर कसा अन्याय झाला, असं सांगण्यात मला रस नव्हता, कारण तसं काही झालेलंच नाही" असंही राहुल म्हणाले.