
भारत इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. असं असताना या मालिकेतील पहिलाच सामना भारताने गमावला आहे. आता दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे होणार आहे.

पहिला कसोटी सामना हैदराबाद येथे झाला. ही खेळपट्टी संथ होती त्यामुळे भारताला सामना गमवण्याची वेळ आली. असं असताना दुसऱ्यया कसोटीसाठीची खेळपट्टीही गूढ आहे. त्यामुळे टीम इंडियाची धाकधूक वाढली आहे.

विशाखापट्टणमच्या डॉ वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये आतापर्यंत फक्त दोन कसोटी सामने खेळले आहेत. दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. असं असलं तरी विशाखापट्टणमच्या खेळपट्टी फलंदाज की गोलंदाजांना मदत करणारी आहे याबाबत अंदाज बांधणं कठीण आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि द्रविडची डोकेदुखी वाढली आहे.

हैदराबाद आणि अहमदाबादची खेळपट्टी संथ असल्याने फलंदाजांना चांगलाच संघर्ष करावा लागतो. पण विशाखापट्टणम येथील खेळपट्टीचा अंदाज बांधणं कठी आहे. दुसरीकडे, इंग्लंडच्या बेझबॉल रणनितीमुळे कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे भारतीय संघासमोर फिरकी हा एकमेव पर्याय उरतो.

विशाखापट्टणमच्या खेळपट्टीवर दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत. पहिल्या डावात सरासरी 478, दुसऱ्या डावात सरासरी 343, तिसऱ्या डावात सरासरी 263 आणि चौथ्या डावात सरासरी 174 धावा झाल्या आहेत.

आतापर्यंत झालेल्या दोन्ही कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. खेळपट्टी जस जशी जुनी होत जाते, तस तशी त्यावर स्पॉट तयार होतात. त्यामुळे पुढे जाऊन फिरकीपटूंना मदत होते.